प्रतिनिधी (आरकेजी): इंग्रजांनी इतिहासाचे लबाडपणे लेखन केले. पेशवाई परत येण्यासाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी बंड केले ते दरोडे घालत होते, असा खोटा इतिहास लिहून ठेवला. त्यामुळे काही झुरळसम्राट इतिहासकार तेच पुढे लिहून समाजात तेढ निर्माण करतात. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र व्हावे याकरिता फडके यांनी बंड केले. यांच्या लढ्याला महात्मा फुलेंच्या कष्टकरी, शेतकरी, माळकरी वर्गाने मदत केली. सुधारकाचे नाव घेऊन भांडणे सोपे आहे. पण एकत्र आणणे हे व्रत आहे. फुले यांनी सांगितले समाजाने सत्यशोधक व्हावे. त्यामुळे खरा इतिहास जाणून घ्या, असे सूचक प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
महाजन क्रीडा संकुलात कीर्तनसंध्यातर्फे दुसर्या दिवशीच्या कीर्तनात बुवांनी क्रांतिकारक फडके व त्यांचे बलिदान याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, फडके यांच्या आजोबांनी त्यांच्यावर लहान वयात शिवछत्रपतींचे चरित्र शिकवले. तेव्हापासूनच त्यांच्या मनात इंग्रजांविरोधात चीड निर्माण होत होती. दुष्काळ पडला तेव्हा ख्रिश्चन लोक हिंदू मुले घेऊन धर्मांतर करत होती. धर्मांतराच्या या वादळात फडके यांनी हिंदू असोसिएशन स्थापन केली. त्यात हिंदूंसह अन्य धर्मियांच्या मुलांनाही जागा दिली, पण त्यांचे धर्मांतर केले नाही. इंग्रजांची शिक्षणपद्धती नोकरशाही निर्माण करत होती. त्यांनी रेल्वे आणली ती सैन्य वेळेवर पोहोचण्यासाठी. मात्र रेल्वेत बसायला मिळावे म्हणून भारतीयांना अत्यानंद होत होता. गुलामाला गुलामी भूषण वाटत होते. अशा काळात फडके यांनी दहा वर्षे मिलिट्री फायनान्समध्ये नोकरी केली. तिथली इत्थंभूत माहिती मिळवली. त्यांच्या मनात असंतोष खदखदत होता. बंड करायचे ठरत होते. त्यातच त्यांची आई आजारी पडली व साहेबाने सुट्टी दिली नाही आणि संघर्षाला ठिणगी पडली. त्यांनी रामोशांना एकत्र केले. इंग्रजांच्या चांगल्या बंदुका खराब झाल्या, असे सांगून इंग्रजांच्याच कामगारांनी फडके यांना त्या दिल्या. स्वराज्यासाठी लागणार्या पैशांसाठी दरोडे घातले. पण जे सावकार पिळवणूक करत होते त्यांच्यावरच दरोडे घातले व फक्त निम्मे पैसे, सोने-नाणे मिळवले. पण हे स्वराज्यासाठी घेत आहे, स्वराज्य मिळाले की परत देऊ अशी पावतीही फडके देत होते. त्यासाठी स्त्रिया, मुलांना त्रास देऊ नये अशी कडक नियमावली बनवली होती.
फडके हे लढवय्ये होते. तलवार दातात पकडून गिर्यारोहण करणे, घोडेस्वारी, दांडपट्टा दातात धरून दरी उतरणे, बंदुका चालवणे अशा अनेक शारीरिक कसरतींमध्ये ते माहीर होते. बंदुका चालवण्याचे व लाठीकाठीचे वर्ग ते घेत होते. इंग्रजांविरोधात लढायला सैनिक तयार करत होते. त्यांच्या वर्गात लोकमान्य टिळक हेसुद्धा होते. लढ्यामध्ये इंग्रज पोलिसांना फडके यांना पकडणे शक्य झाले नाही. पाच महिन्यांनंतर कर्नल डॅनियल या लष्करी अधिकार्याने त्यांना पकडले. फडके यांना पकडण्यासाठी त्याने 4 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते व त्याला उत्तर म्हणून फडके यांनी मुंबईच्या गव्हर्नरचे मुंडके कापेल त्याला 9 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. यामुळे इंग्लंडच्या वृत्तपत्रातही फडके यांचा डंका वाजला. पकडल्यानंतर कोर्टाने त्यांना एडनच्या तुरुंगात रवानगी केली. तेथे क्षयाने त्यांचा मृत्यू झाला. पण फडके यांच्या वीरमरणाने अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली. नको देवराया अंत असा पाहू, 1879 चे साल वासुदेवाचे वीर फिरतात, धाव धाव दत्ता आदी पदे बुवांनी ऐकवली. त्यांना तालवाद्यसाथ सौ. आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई यांनी केली. तसेच मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांची वाद्यसाथ मिळाली.