
महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त साळवी स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळात प्रचंड गर्दीत बुवांचे कीर्तन रंगले. त्यावेळी बुवा बोलत होते.

आफळेबुवा म्हणाले की, सावरकर यांचे वक्तृत्व जन्मजात होते. पुण्यात एसपी कॉलेजच्या क्रिकेट मैदानावर त्यांच्या प्रचंड मोठ्या सभा होत. त्यांच्या कोणत्याही कृतीत देश प्रथम व मग बाकी सर्व असे होते. सावरकरांनी सर्वस्वाचा त्याग केला. बॅरिस्टर पदवी असो वा आयुष्यातील सगळे क्षण त्यागले. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीवीर घडवले. त्याकरिता अनेक युवकांना प्रेरणा दिली. सावरकर हे द्रष्टे होते. पुढे होणारे त्यांना दिसत होते. गोवा मुक्ती संग्राम असो व हैद्राबाद स्वातंत्र्य. या दोन्ही वेळी लष्कर घुसवा असे सावरकरांचे मत होते. त्या वेळी तेच करावे लागले. सध्या सुविधा महत्वाची नाही, सुरक्षा महत्वाची आहे, हे सामान्य माणसाच्या ध्यानी आले पाहिजे. आपण कोणाला जागा, जमिन विकतोय, भारत विरोधी लोकांना पैसे मिळतायत का याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे, असे बुवांनी ठणकावून सांगितले.

बुवा म्हणाले की, वीर सावरकर हे असे जगात एकमेव लेखक, साहित्यिक आहेत की पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच बंदी आली. १० हजार कवितेच्या ओळी तुरुंगात लिहिल्या, पाठ केल्या व नंतर पुस्तके प्रकाशित झाली, असा जगातला एकमेव कवी म्हणावा लागेल. लेखनातून राष्ट्रसेवा केली. स्वतंत्रता देवीचे काव्य जयोस्तुते हे लिहून ते महाकवी झाले. साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. साहित्यतले सर्व प्रकार त्यांनी लिहिले.
एखाद्या सण, उत्सवात ज्या प्रकारे मूर्तीला सजवले जाते. त्यानुसार नाटक, कविता, वाळू शिल्प, शोभायात्रा, कीर्तन, सहभोजन अशा विविध माध्यमातून सावरकरांची मूर्ती सजवण्यात येत आहे. सावरकर हे शतपैलू होते. त्यातील आठ पैलू बुवांनी मांडले. सावरकरांचे विचार प्रत्येक शाळेत पोहोचले पाहिजेत. त्याकरिता सावरकरांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत. किमान स्वतः आठवड्यातून एक दिवस सर्वेक्षण करावे असे आवाहन बुवांनी केले. बुवांनी गोविंदस्वामी आफळे रचित होळी बांधा रे हे गीत बुवांनी सुरेख सादर केले. तसेच आकाशी झेप घे रे पाखरा, ने मजसी ने परत मातृभूमीला या गीतांनी प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या.
सुरवातीला श्री गणेशाचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नाचणे गावचे सरपंच भैय्या भोंगले यांच्या हस्ते बुवांचा सत्कार करण्यात आला. संगीत साथीदारांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य शुभम सावंत, ओम साई मित्रमंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे आणि विचार सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड यांच्या हस्ते करण्यात आला. बुवांना ऑर्गनसाथ रेशीम खेडकर, तबलासाथ मिलिंद तायवाडे, पखवाज मनोज भांडवलकर आणि व्हायोलिनसाथ प्रमोद जांभेकर यांनी सुरेखपणे केली.