
रत्नागिरी : कोकणातल्या खावटी कर्जाला सुद्धा कर्ज माफीचा लाभ मिळणार असून, लवकरच या संदर्भातील जीआर शासन काढणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. रत्नागिरीमध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी समारोप सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारने कर्ज माफी केली, मात्र कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा म्हणावा तसा लाभ मिळालाच नाही. कोकणातला बहुतांश शेतकरी हा खावटी कर्ज घेत असतो आणि ते कर्ज वेळेतच फेडतो, त्यामुळे हा कर्जदार सरकारने केलेल्या कर्जमाफीपासून वंचित राहिला होता, मात्र आता खावटी कर्जाला सुद्धा कर्जमाफी मिळणार असून लवकरच याबाबत जी आर काढला जाणार असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात जाहीर केलं. त्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्याला सुद्धा याचा लाभ मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान राज्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितींना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयाचे सहकार मंत्री सुभाष देखमुख यांनी स्वागत केलंय. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. परराज्यातून या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात माल येवू शकेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल. खास करून मुंबई, पुणे नागपूर अशा सारख्या बाजार समितीना याचा नक्कीच फायदा होईल असं सांगत या निर्णयाचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्वागत केलंय.
तर बॅटरीच्या प्रकाशात दुष्काळाची पहाणी करणाऱ्या निलंगेकर पाटील यांची पाठराखण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलीय. कदाचित प्रवासामुळे उशिर झाल्यामुळे असं झालं असावं असा अंदाज बांधत सुभाष देशमुख यांनी निलंगेकर यांची पाठराखण केली..
दरम्यान चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने 25 वर्षांत केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचं विशेष कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.