रत्नागिरी, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात आज रत्नागिरीतही काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीतल्या काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर हे निषेध आंदोलन करण्यात आलं.
मोदी सरकारला आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. तर एकूण कार्यकाळातील सात वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र या सात वर्षांत देशाला मोदी सरकारने मागे नेले. त्यामुळे हे अपयशी सरकार असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून याचा निषेध म्हणून आज मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे.
रत्नागिरीत देखील काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध केला. रत्नागिरीतील काँग्रेसभवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. या आंदोलनाच्या वेळी ‘सात वर्षे अपयशाची, जनतेवरील अन्यायाची, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचा निषेध असो अश्या घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणदणून गेला होता. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी , सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री,मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे ,महिला तालुकाध्यक्ष रिझवना शेख, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर उपस्थित होते