रत्नागिरी (आरकेजी): काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी आम्ही त्यांना मानत नाही. कार्यकारिणी बरखास्तीबाबत सोनिया गांधी यांचाच आदेश हवा, त्यांनी सांगितले तरच सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त झाली असे मानू, असे सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी चव्हाणांना सुनावले.
काँग्रेसचे जेष्ठ नेते नारायण राणे गुरुवारी घटस्थापनेच्या दिवशी मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सध्या कोकणातलं वातावरण ढवळून निघत आहे. त्यातच आज काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी चक्क रत्नागिरीतल्या काँग्रेसभवन येथे पत्रकार परिषद घेऊन चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. अशोक चव्हाण काँग्रेस संपवू पहात आहेत. नांदेड मतदारसंघात नगरसेवक शाबूत ठेवू शकत नाहीत अशा चव्हाणांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. प्रत्येक जिल्ह्यात वाद निर्माण करायचे काम चव्हाण करत आहेत. भाई जगताप, हुसेन दलवाई, रमेश किर हे सर्व काँग्रेसला अधोगतीला नेत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तसेच काँग्रेस संपवणाऱ्या अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त झाली, असे आदेश सोनिया गांधी यांनीच द्यायला हवेत, तोपर्यंत कार्यकारिणी बरखास्त झाली असे आम्ही मानणार नाही, असे निलेश राणे म्हणाले.