मुंबई : विविध, शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठात कंत्राटी व अतिथी व्याख्याता, तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांना लॉकडाऊनच्या काळातील मानधन संबंधित शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून देण्याची मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया राज्य समितीने केली आहे. लॉक डाऊन झाल्यावर शैक्षणिक संस्था बंद असल्याने त्यांना उत्पन्नाशिवाय तीव्र संकटाचा सामना करावा लागत आहे, याकडे डिवायएफआयने राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
देशाला घडवणारे शिक्षक, प्राध्यापक एक मोठी महत्वाकांक्षा घेऊन शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन करून नोकरी अभावी पदरी पडले तेच पवित्र झाले या मानसिकतेतून कार्यरत आहेत. योग्यता, पात्रता, शैक्षणिक आर्हता असूनही आयुष्यातला कमवता आणि उमेदीचा काळ केवळ उदरनिर्वाह आणि कौटुंबिक जबाबदारी पोटी कंत्राटी आणि तासिका तत्वावर काम करणे नाईलाजास्तव स्वीकारले,असे डिवायएफआयकडून सांगण्यात आले.
मदतीसाठी कुणाकडे याचना ही करू न शकण्याऱ्या त्यांच्या या गंभीर परिस्थितिचा विचार करून त्यांना आर्थिक मदत मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने मानधन देण्याची व्यवस्था करावी अशी न्याय हक्काची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकडे करीत आहेत, असे डिवायएफआयच्या सेक्रेटरी प्रीति शेखर यांनी सांगितले.