दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात ज्या ठिकाणी कांदळवने आहे तेथे अत्यंत कमी नुकसान झाले त्यामुळे त्याचे महत्व सांगणारा हा खासलेख देत आहे.
महाराष्ट्राचा एकूण 720 कि.मी. लांबीचा सागरी किनारा खारफुटी वनस्पती, संगती वनस्पती व इतर जैवविधितेने नटलेला आहे. रत्नागिरी हा महाराष्ट्र किनारपट्टीवरील एक महत्वाचा जिल्हा आहे. खारफुटीच्या जवळपास 20 प्रजाती वनस्पती येथे पाहावयास मिळतात. रत्नागिरी जिल्हयामध्ये एकूण 2432 हेक्टर शासकीय कांदळवन क्षेत्र आहे. या कांदळवन क्षेत्राला राखीव वने म्हणून संरक्षण देण्यात आले आहे. नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी एक वेगळी परिसंस्था निर्माण होते. या परिसंस्थेला कोकणामध्ये ‘खाजण’ म्हणतात. खाजण भागाला इंग्रजीमध्ये Intertidal region असे म्हणतात. तसेच या खाजन परिसंस्थेला Estuarine ecosystem असे म्हणतात. या भागातील पाण्याची क्षारता नदीचे पाणी व समुद्राचे पाणी या पेक्षा वेगळी असते. उन्हाळयामध्ये क्षारता जास्त असते तर पावसाळयामध्ये क्षारता कमी असते. हिवाळयामध्ये क्षारता मध्यम असते. दिवसातून दोनवेळा भरती व ओहोटी येते. त्यामुळे दररोज या परिसंस्थेत बदल होतो. अशा खारफुटी परिसंस्थेला Dynamic परिसंस्था म्हणतात. कांदळवनाचे मानवजातीला मोठे फायदे आहेत. आताच येउन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा वेग ज्या ठिकाणी कांदळवने आहेत त्याठिकाणी मंदावला, ज्यामुळे किनारपट्टीला आतील बाजूस असलेल्या गावांना चक्रीवादळाचा कमी फटका बसला. कारण कांदळवने ही चक्रीवादळ आणि सुनामी यासारख्या नैसर्गिक संकटांमध्ये ‘जैविक भिंत’ म्हणून काम करतात. याशिवाय समुद्रातील मासे अन्न, निवारा आणि प्रजननांसाठी कांदळवनात येतात त्यामुळे मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीनेपण कांदळवने फार महत्वाची आहेत. यातून सागरी लोकवस्तीला उपजिवीका प्रदान होते. याशिवाय वातावरणातील CO2 मोठया प्रमाणावर शोषून घेणे, जागतिक तापमान वाढ नियंत्रित करणेस मदत करणे, समुद्र किना-याची धूप थांबविणे, घातक रसायने शोषून खाडी क्षेत्रास संरक्षण देणे, सुंदर असे निसर्ग पर्यटन, विवि मासे, पक्षी,
किटक व सरपटणारे प्राणी यांना संरक्षण देणे यासारखे कांदळवनांचे अतिशय महत्वाचे फायदे आहेत. हे जरी असले तरी कांदळवनांना नैसर्गिक वादळ, वावटळी, वनवे, सुक्ष्मजीव असे धोके आहेत आणि मानवनिर्मित औदयोगिकीकरण, वाळूउपसा, अवैध उत्खनन, वारेमाप पर्यटन, प्रदुषण, घनकचरा, धरण/बंधारा. अशाप्रकारचे धोके देखील आहेत.
अशा या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असणा-या कांदळवनांच्या लोकसहभागातून संरक्षण करण्यासाठी वनविभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई यांचे अधिनस्थ राज्यातील सर्व समुद्रकिनारी जिल्हयांमध्ये कांदळवन संरक्षण व उपजिवीका निर्माण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून खाजगी, शासकीय व सामुहिक कांदळवन क्षेत्रात उत्पादनक्षम साधने वाढविणे,
नियोजनबद्ध संरक्षण व संवर्धन करणे, अवलंबुन जनता यांच्यातील सहकार्य वृद्धींगत करणे, अशी उद्धिष्ठे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समितीमार्फत विविध रत्नागिरी जिल्हयामध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समितीमार्फत विविध प्रकल्प शासन निर्णयानुसार सुरू करणेत आलेत. यामध्ये कालवेपालन हा प्रकल्प गावखडी, धाउलवल्ली, बुरंबेवाडी, जुवे-जैतापूर, जानशी, अणसुरे येथे सुरु करणेत आला आहे. शोभिवंत मत्स्यपालन हे आडे, मयेकरवाडी, धाउलवल्ली येथे सुरु करण्यात आले आहे. जिताडा मत्स्यपालन हे सागवे, गावखडी, मालगुंड व राई या गावांमध्ये प्रस्तावित आहे. खेकडापालन प्रकल्प शिरसे, जानशी, पावस, वरवडे, मालगुंड, राई, गडनरळ, मुर्डी या गावांसाठी प्रस्तावित आहे. निसर्ग पर्यटनातून रोजगार उपलब्धीसाठी सोनगाव व आंजर्ले येथे प्रयत्न करण्यात येत आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांची कांदळवन संरक्षणाची तसेच एकूणच पर्यावरणाचा -हास होणार नाही ही मोठी जबाबदारी आहे.
‘येऊ देत कोणतेही निसर्ग संकट, कांदळवन करेल आपले संरक्षण’ – जिल्हा माहिती कार्यालय,रत्नागिरी