
नाशिक, 10 मे : लॉकडाउनमध्ये कामगार-कष्टकऱ्यांची उपासमार होत आहे. तसेच विविध मागण्यांबाबत आज रविवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने मागणी दिवस पाळला. कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनही केले गेले.
केंद्र सरकारने तातडीने संकटात असलेल्या श्रमिकांना जगवण्यासाठी निर्णय करावेत व मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा लॉक डाऊन उठल्यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सीटूचे व कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते डॉ. डी .एल .कराड यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील उद्योगातील कंत्राटी व हंगामी कामगार तसेच अनेक कंपन्यातील कायम कामगारांना मार्च लॉकडाउन काळाचे व एप्रिल महिन्याचे वेतन मालकांनी दिलेले नाही. सातपूर औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयोग झालेला नाही. कंत्राटी व हंगामी कामगार कामावरून काढून टाकण्याच्या भितीने तक्रार करत नाहीत, असा आरोप नाशिक वर्कस युनियनचे तुकाराम सोनजे, संतोष काकडे यांनी केला.
मालेगावमध्ये पावर लूम कामगारांनाही मालकांनी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार लॉकडाऊन काळाचे वेतन दिलेले नाही. तसेच घर कामगार ,बांधकाम मजूर ,वीटभट्टी कामगार, अनेक दुकाने मॉलमधील कामगारांनाही अनेक मालकांनी एप्रिल महिन्याचे वेतन दिले नाही ,अशा तक्रारी आल्या आहेत, असे यावेळी घर कामगार व बांधकाम कामगार संघटनेच्या सेक्रेटरी सिंधू शार्दुल यांनी सांगितले
लॉक डाउन असूनही सिटू संघटनेच्यावतीने खुटवडनगर येथे हातात मागण्यांचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले .
मालेगाव शहरातही पावर लूम कामगारांनी त्यांच्या घरासमोर उभे राहून हातात फलक लावून आंदोलन केले . वरील क्षेत्रातील कामगारांना त्यांचे वेतन मिळवून द्यावे, या मालकांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत व विविध कामगार कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे व जिल्हा सेक्रेटरी देविदास आडोळे यांनी केली आहे.