मुंबई : महापालिकेने मुंबईतील काही भागात दहा टक्के पाणी कपात केली आहे. त्याचा फटका जोगेश्वरी पूर्वेतील शिवटेकड़ी, दत्तटेकड़ी, मजासगाव टेकड़ी येथील रहिवाशांना बसला आहे. टेकड्यांचा भाग असल्याने या पूर्वीच या ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबाने होत होता. त्यातच कपातीमुळे आणखी भर पडली आहे.
रोजच्या वापरासाठी लागणारे मुबलक पाणीही मिळत नाही, अशी व्यथा रहिवाशांनी मांडली आहे. या परिसरात महापालिका के पूर्व विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. हे पाणी दैनंदिन वापरासाठी वापरले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी मात्र हाल सहन करावे लागत आहेत. त्यासाठी ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
टेकडी परिसरात जास्त दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.