नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात मानवाचे संरक्षण व्हावे, याठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ३६ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अनुमतीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०१६’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील गोविंद लक्ष्मण तुपे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार तेजस ब्रिजलाल सोनवणे, मनोज सुधाकरराव बारहाते आणि निलकांत रमेश हरिकांत्रा यांना जाहीर झाला आहे.
देशातील ३६ नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ७ व्यक्तिंना हे पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाले आहेत. ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ ५ जणांना जाहीर झाले आहेत. ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ ८ जणांना आणि ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ २३ जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य सरकारच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.