रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील चिंचनाका येथील जि. प. शाळा क्र. 1 च्या इमारतीच्या निर्लेखन मुद्दावरून जि. प. सदस्य व विरोधी गटनेते विक्रांत जाधव यांनी सत्ताधार्य़ांवर आरोप केले आहेत. चिंचनाका शाळा भूखंड चिपळूण न.प.ने 99 वर्षांच्या भाडेकरारावर घेतली असून, शैक्षणिक वापरासाठी जिल्हा परिषदेला दिली आहे. हा भाडेकरार काही वर्षांपूर्वी संपुष्टात आला असून, मोक्याच्या ठिकाणी असणारी ही जागा खासगी विकासकाला देण्याचा घाट काहीजणांनी घातला आहे. यामध्ये चिपळूण नगर परिषदेबरोबरच जिल्हा परिषदेतील अनकांचे हात गुंतले असून, अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचा आरोप विक्रांत जाधव यांनी केला आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जाधव म्हणाले की या शाळेला टिळकांच्या काळापासून ऐतिहासिक वारसा लाभला असून, सध्या 30 हून अधिक मुले शिकत आहेत. कमी पटसंख्येमुळे ही शाळा बंद होऊ शकत नाही. जो पर्यंत या शाळेत मुले शिकत आहेत तोपर्यंत ही शाळा बंद करू नये, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, तरीही जिल्हा परिषदेने ही शाळा तोडण्याची तयारी सुरू केली आहे. येथील विद्यार्थ्यांना ज्या शाळेत पाठवण्यात येणार आहे त्या शाळेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद स्थायी समितीच्या मागील सभेत न झालेले ठरावही इतिवृत्तात नोंदवले गेेले आहेत. चिंचनाका शाळा निर्लेखनाचा ठरावही असाच मागावून घातला गेला आहे. आपणही या सभेत शेवटपर्यंत होतो. परंतु, असा कोणताही ठराव झाला नसल्याचे विक्रांत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सीईओंनी चौकशी करावी अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.
दरम्यान सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी जिल्ह्याला अनेक वर्षे मागे नेले आहे. प्रशासन घेत असलेल्या निर्णयाचा पदाधिकार्यांना थांगपत्ताही नसतो. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचकच राहिला नसल्याचा आरोप जि. प. सदस्य व विरोधी गटनेते विक्रांत जाधव यांनी केला आहे.
25 वर्षे सत्ता असूनही उत्पन्न वाढलेले नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेची वाटचाल अधोगतीकडे होत असल्याचंही जाधव यांनी म्हटलं आहे..