
रत्नागिरी : झेप उद्योगिनीची’ या कार्यक्रमातून महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन मिळाले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिलांनी आपल्या शंका, समस्या या व्यासपीठावर मांडल्या. स्वयंरोजगार, घरातून व्यवसाय करणार्या उद्योगिनी, स्वत:चा उद्योग सुरु करु इच्छिणार्या महिला, बचतगटांच्या माध्यमातून व्यवसाय करणार्या महिलांना व्यवसायासह मार्केटिंग, वस्तूविक्रीसह बँकेच्या विविध योजना आदींची माहिती देण्यात आली.
सिंधुदुर्ग उद्योग भवन, सिंधुदुर्ग आणि झेप उद्योगिनीची, मुंबई या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये झेप उद्योगिनींची संस्थेच्या संस्थापिका पूर्णिमा शिरिषकर, करियर विजन संस्थेच्या संस्थापिक विभूती कुलकर्णी आणि अमाजी वर्ल्ड संस्थेच्या संस्थापिक ममता सिंग उपस्थित होत्या. यावेळी पौर्णिमा शिरिषकर यांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थित महिला लघुउद्योजकांशी संवाद साधला. उद्योग, व्यवसाय करताना येणाºया अडचणींवर अचूक बोट ठेवत त्यातून मार्ग काढण्यासाठी काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन केले. कोणताही उद्योजक खर्या अर्थाने स्वातंत्र्य कधी व कसे अनुभवू शकतो व त्यासाठी व्यवसायाला उद्योग उभारणीच्या कोणत्या मुलभूत टप्प्यांमधून जावे लागते याची माहिती त्यांनी दिली.
करियर विजन संस्थेच्या संस्थापिका विभूती कुलकर्णी यांनीही शैक्षणिक क्षेत्रामध्ये उतरूनही कसा व्यवसाय करता येऊ शकतो याची माहिती दिली. तर अमाजी वर्ल्डच्या ममता सिंग यांनी कोकणात पर्यटन व्यवसाय वाढत असताना त्यामध्ये महिलांचा सहभाग कसा वाढेल याबाबत माहिती दिली.
महिलांनीही यावेळी या संवादात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तिलोत्तमा खानविलकर, उमेदच्या तालुका व्यवस्थापन अधिकारी भंडारी, अॅड. अश्विनी देसाई आणि पत्रकार अनघा निकम- मगदूम यावेळी उपस्थित होत्या. मराठा मंडळाच्या वतीने काकी नलावडे यांनी उपस्थित तिन्ही उद्योजिका महिलांचा सत्कार केला.