
लोकशाहीर, महाकवी आणि आंबेडकरी विचारांचे खंदे प्रचारक वामनदादा कर्डक यांनी औपचारीक शिक्षण झालेले नसताना दहा हजारांहून अधिक गीते लिहिण्याचे काम केले. परंतु ते केवळ गीतकार वा कवी नव्हते! आपल्या गाण्यातून व्यवस्थेला सवाल करण्याचे काम त्यांनी केले.
सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठे आहे हो,
सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठे आहे हो
घाम शेतात गळ
चोर आयतच घेऊन पळ
हे आणि अशी गाणी कायमच चळवळीतील कार्यकर्त्यांच्या ओठांवर राहिली आहेत. वामनदादांना प्रतिभेची जन्मजात देणगी होती. बुद्ध, फुले आणि आंबेडकर यांचे विचार ही त्यांची प्रेरणा किंबहुना तोच त्यांचा श्वास होता. आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशही पालथा घातला होता. आपल्या ओजस्वी वाणी आणि तेजस्वी लिखाणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गाव-खेड्यातच नव्हे तर तांड्या-तांड्यापर्यंत आणि घरा-घरात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. पण बहुजन समाजातील या महाकवी आणि गीतकाराचा यथोचित सन्मान महाराष्ट्र करू शकला नाही. १५ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस! यंदाच्या स्वातंत्र्यदिनापासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. परंतु राज्य सरकारने त्याची दखल घेतल्याचे दिसत नसल्याचे मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी, युवाध्यक्ष केतन कदम, तसेच विलास रोहिमल, ज्योती बडेकर, शाहीर संदेश गायकवाड, प्रमोद शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे जन्मशताब्दी वर्षात, जेथे त्यांना काव्य स्फुरले आणि त्यातून त्यांची महाकवी अशी ओळख झाली, त्या मुंबईत त्यांचे यथोचित स्मारक व्हावे. तसेच त्यांच्या हयातीत त्यांना न दिलेल्या पद्म पुरस्कारासाठी राज्य सरकारने त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करावी आणि महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्काराने त्यांचा यथोचित गौरव करावा, अशी मागणी या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.