मुंबई : लॉक डाउन काळात संकटात सापडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना गावी जाता यावे, यासाठी राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने जनता दल सेक्युलरने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत असणार्या कोकणातील श्रमिक, कष्टकरी नागरिकांसाठी आम्ही आहोत, असे जनता दलाकडून सांगण्यात आले आहे. चाकरमान्यांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू, असेही जनता दलाने सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्षाने एक पत्र लिहिले आहे. या पत्रात चाकरमान्यांना भेडसावणार्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात जनता दल सेक्युलरने म्हटले आहे की,
कोकणी माणसाने केलेला त्याग, गाळलेला घाम आणि प्रसंगी सांडलेले रक्त यावरच शिवसेना उभी राहिली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे हे माझे सरकार आहे, असे कोकणी माणूस निश्चितपणे म्हणू शकतो. शिवसेना राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे. आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहात.
मात्र, “असूनही खास मालक घरचा…” आज कोकणी माणूसच राज्यात उपरा ठरतो आहे!
कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लाॅकडाऊन जारी झाला, त्याला आता दोन महिने होत आले. या लाॅकडाऊनमुळे सगळ्याच कष्टकऱ्यांची परवड झाली, मुंबईतल्या चाळी, झोपडपट्ट्या यातून राहणारा कोकणी माणूसही यातून सुटलेला नाही.
परप्रांतीय कष्टकरी माणूस धीर सुटल्यामुळे आणि सरकारकडून साथ मिळेल, याची शाश्वती न राहिल्याने आठशे हजार किलोमीटर चालत मुलखाकडे रवाना झाला. त्याच्या परवडीची सोशल मीडियावर चर्चा झाली आणि त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत तरी त्याला एसटीने मोफत सोडण्याची व्यवस्था केली. यासाठी खास ५५ कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आली. काँग्रेस पक्षाने किमान काही लोकांच्या तिकिटाची व्यवस्था केली आणि आज बऱ्यापैकी तरी कामगार आपापल्या राज्यात रवाना झाले आहेत.
या सगळ्या घडामोडींकडे मुंबईतील कोकणी माणूस बारकाईने लक्ष ठेवून होता, कारण त्यालाही या अडचणीच्या काळात आपला गाव आठवत होता, दिसत होता.
परराज्यातील कामगार रवाना झाले की सरकार आपल्या बाबतीत निर्णय घेईल, आपल्याला सुखरूप मुंबईबाहेर काढेल, गावाला पोहोचवील, ही त्याची अपेक्षा होती, कारण हे सरकार माझे आहे, ही त्याची सहज भावना होती.
मात्र, आज अपेक्षाभंगाचे दु:ख उरी बाळगून तोही त्या परराज्यातील कष्टकऱ्यांप्रमाणे उपऱ्यासारखा चालत आपल्या गावाची वाट धरू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत किमान तिघाजणांचा गावच्या आशेने धावत असताना उर फुटून मृत्यू झाला आहे. परराज्यातील कष्टकऱ्यां इतकीही आस्था आज आपल्या वाट्याला नाही, ही भावना मुंबईतील चाकरमान्यांच्या उरी दाटली आहे.
आज ना कुणी त्याला, तू मुंबई सोडायची नाहीय, असे सांगत आहे, ना कुणी त्याला गावाकडे जाण्याची रितसर परवानगी देत आहे. मुंबईत रहायचे म्हटले तर झोपडपट्टीत, चाळीत सार्वजनिक गोष्टींचा वापर करताना कोरोना कधी येईल याची भीती त्याला सतावते आहे, दुसरीकडे गाठीचा पैसा संपत आल्याने पोराबाळांच्या उपासमारीचं संकट समोर आहे. त्यामुळे आपला गाव बरा, अशी भावना आज त्याच्या उरी बळावली आहे. मात्र, कोकणी माणसाला गावी जाण्याची नक्की परवानगी दिली आहे वा नाही, याची कोणतीच स्पष्टता अद्याप नाही. वाहतूक मंत्री अनिल परब यांनी प्रारंभी मुंबईबाहेर जाणाऱ्यांसाठी मोफत एसटीची सुविधा देणार, अशी घोषणा केल्यामुळे त्याचे मन सुखावले होते. परंतु, ही घोषणा नीट कानी पोहोचेपर्यंत खुलासा आला, एसटीची मोफत सुविधा फक्त परराज्यातील कष्टकऱ्यांसाठी आहे.
मुख्यमंत्री महोदय, कोकणी माणसाची चूक काय आहे? आपल्या पक्षाला त्याने साथ दिली ही चूक ठरली आहे का?
त्याने मुंबई सोडायची नसेल तर, तसे स्पष्ट करा, पण त्याबरोबरच त्याची काही व्यवस्था करा. त्याला गावाकडे जाण्याची परवानगी देत असाल, तर ते स्पष्ट करा! पण त्याचबरोबरच त्याच्या जाण्याची व्यवस्था करा! आज ना त्याला एसटीचा पर्याय आहे ना रेल्वेचा! खासगी बसमालक २५०० ते ३००० हजार रुपयांपर्यंत तिकीट सांगत आहेत. कुटुंबात पाच-सात माणसे असतील तर १५-१७ हजार रुपये त्याला मोजावे लागणार! त्याने हा पैसा कुठून आणायचा! दुसरीकडे गावी गेल्यानंतर कसे स्वागत होणार आहे, याची भीती त्याचे मन पोखरते आहे. चाकरमान्यांनी सध्या तरी गावाकडे येऊ नये, असे आडवळणाने त्याला सूचवले जात आहेच!
अशा स्थितीत मुख्यमंत्री महोदय आपल्याकडून कोकणी माणसाला आधाराची अपेक्षा आहे. त्याला गावाकडे जाण्याची रितसर परवानगी देण्यात यावी. तशी स्पष्ट घोषणा करण्यात यावी. गावाकडे जाण्यासाठी एसटी तसेच रेल्वेची व्यवस्था करण्यात यावी, खासगी बसच्या तिकिटाच्या किमतीवर मर्यादा आणण्यात यावी, गावी गेल्यानंतर किमान ज्यांचे स्वतःचे घर बंद अवस्थेत आहे. त्यांना तेथे होम क्वारंटाईन होण्याची परवानगी असावी, याचा निश्चित कालावधी जाहीर करावा, अशी मागणी जनता दल (से) मुंबई पक्ष तसेच कोकण जनविकास समितीच्या वतीने आम्ही आपल्याकडे करीत आहोत. कृपया तातडीने विचार व्हावा, अशी विनंती सुहास बने, प्रभाकर नारकर, सलीम भाटी, ज्योती बडेकर, अपर्णा दळवी, विद्या नाईक, संजीवकुमार सदानंद, मतीन खान, विलास रोहिमल, जगदिश नलावडे, सुरेश रासम महेश मलुष्टे, कोकण जनविकास समितीने केली आहे.