मुंबई, दि. १८ : त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली महाराष्ट्रात हिंदी भाषा लादण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर भारतातील हिंदी भाषिकांना दक्षिणेकडेल एखादी भाषा शिकण्याचा सल्ला द्यावा, असे सांगत जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाने राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याच्या निर्णयास विरोध केला आहे.
राज्यातील जनतेने हिंदी शिकण्यामुळे त्यांच्या रोजगाराच्या व अन्य कुठल्याही संधीत वाढ होणार नाही. मात्र राज्यात हिंदी भाषेचा प्रभाव अधिक वाढवून मराठी भाषेची पिछेहाट होईल, त्यामुळे जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र पक्षाचा या निर्णयाला विरोध असल्याचे पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर, तसेच सरचिटणीस सलिम भाटी, चिटणीस संजय परब यांनी म्हटले आहे.
देशात त्रिभाष सूत्राची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला आहे. परंतु ना उत्तरेकडील राज्यानी दक्षिणेकडील एखादी भाषा वा हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषा शिकण्याचा प्रयत्न केला, ना दक्षिणेकडील राज्यांनी हिंदी भाषा स्वीकारली. महाराष्ट्र मात्र या धोरणाचा बळी पडला व यात मराठी भाषेची पिछेहाट झाली, असे श्री. नारकर, श्री. भाटी व श्री. परब यांनी म्हटले आहे.
आता भाजपने पुन्हा हे धोरण पुढे आणले आहे, जे महाराष्ट्रातील जनतेवर व मराठी भाषेवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे तातडीने ते मागे घ्यावे, अशी मागणी करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांना हौस आली असेल तर त्यांनी उत्तरेकडील राज्यांना दक्षिणेकडील एखादी भाषा शिकण्याचे आवाहन करावे आणि ते प्रत्यक्षात आणून दाखवावे, असेही या तिघांनी म्हटले आहे.