रत्नागिरी,(कोकणवृत्तविशेष)/आरके. : यांत्रिकी वर्कशॉप किंवा गॅरेज व्यवसाय यात महिला सहसा येत नाहीत, असा आजवरचा समज रत्नागिरी शहरातील कल्याणी शिंदे यांनी मोटार मॅकेनिक बनत खोटा ठरवला आहे. दशकभरापासून दुचाकीचं गॅरेज सुरू करून रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे, तर संबंध महाराष्ट्रात स्वत:ची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. गॅरेज म्हटले की ग्रीस, पाना, दुचाकीचा आवाज आदी गोष्टी आल्या. त्यात या व्यवसायात स्त्री आहे, म्हटल्यावर नाके मुरडणारेही बरेच असतात. तरिही जिद्दीच्या जोरावर कल्याणी यांनी हे क्षेत्र निवडले आणि यश मिळवून दाखवले. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व दाखवायला मुलींना, पत्नीला आणले जात आहे. कल्याणी यांनी खर्या अर्थाने औद्योगिक क्रांती रत्नागिरीत करून दाखविली आहे. त्यांना महिला दिनानिमित्त कोकणवृत्तच्या शुभेच्छा!
रत्नागिरी शहरात कल्याणीताईंचे गॅरेजमध्ये आहे. गाडी कोणतीही असो, समस्या काहीही असो त्यांच्या हातात पडली की गाडी दुरुस्त होतेच, अशी विश्वासार्ह्यता त्यांनी निर्माण केली आहे. १५ वर्षांपासून त्या गॅरेज क्षेत्रात कार्यरत आहेत. १९९१ साली रत्नागिरी आयटीआय म्हणून मोटार मॅकेनिक झालेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अनंत अडचणींवर मात करत जिद्दीच्या जोरावर त्यांनी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांच्या पतींची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. दोघे मिळून हे गॅरेज चालवत आहेत.
सुरूवातीचा काळ खूप खडतर होता. गॅरेजमध्ये काम करताना काही लोकांनी खच्चीकरण करण्याचा प्रयत्नही केला पण आत्मविश्वास ढळू न देता मी भक्कमपणे उभी राहिले असे कल्याणीताईंनी सांगितले. महिलांचा वावर सर्व क्षेत्रामध्ये वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेने मॅकेनिक या क्षेत्रात आता खूप सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तरूणींना याक्षेत्राकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.