मुंबई : आजची आपली सर्वांची दैनंदिनी धावपळीची असते. त्यामध्ये सोशल मीडिया, इंटरनेट, गॅझेट, चॅनेल यामध्ये वाचकांना वाचनाशी जोडून ठेवणे आवश्यक आहे. वाचकांनी अधिकाधिक वाचावे, पुस्तकांद्वारे आजची पिढी सुसंस्कारित व्हावी यासाठी येणाऱ्या काळात ग्रंथालयांनी दुवा म्हणून काम करणे आवश्यक आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्काराचे वितरण मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तावडे यांनी ग्रंथालय संचालनालयाचे महत्व विशद केले. यावेळी ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, डॉ.रामेश्वर पवार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तावडे यावेळी म्हणाले, आजच्या तरुणांना ग्रंथालयाशी जोडून ठेवणे, ग्रंथालय सक्षम करणे ही महत्वाची गरज असून यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ग्रंथालयांचा दर्जावाढ करत असताना ग्रंथालयांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असण्याबरोबरच त्या ग्रंथालयात नेमके किती वाचक येतात यावर सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात येणारे पुरस्कार पुढील वर्षापासून त्याचवर्षी देण्यात येतील. आगामी काळात ग्रंथालयांनी वाचक ग्रंथालयात येण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबविणे आवश्यक आहे. आज जाहीर झालेल्या सर्व पुरस्कारार्थींनी या पुढील काळातही वाचन चळवळ अबाधित ठेवण्यासाठी आणि ग्रंथालयाची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी काम करावे, असे आवाहन तावडे यांनी केले.राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयातर्फे राज्यातील शासन मान्यता प्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, अधिक सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालये व ग्रंथालय चळवळीतील उत्कृष्ट कार्यकर्ते व सेवक यांना शासनातर्फे गौरविण्यात येते. सध्या राज्यात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांवर प्रतिवर्षी सुमारे ११० कोटी रुपये परिरक्षण अनुदानावर खर्च होत असून ‘गाव तेथे ग्रंथालय’ निर्माण व्हावीत, समाजाच्या सर्व घटकांसाठी ग्रंथालयाचा लाभ व्हावा म्हणून कार्यान्वित ग्रंथालयांना प्रेरणा मिळावी, अशी शासनाची भूमिका आहे. माहितीच्या युगात ती समर्थ ठरावी, त्यांच्या सेवांमध्ये विविधता येऊन त्यांचा दर्जा वाढावा, ग्रंथालये वाचकाभिमुख व्हावीत. त्यांनी पारंपरिक स्वरुप बदलून त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार करावा. यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उत्कृष्ट काम करणाऱ्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना पुरस्कार देण्याची ही योजना सन १९८४-८५ पासून सुरु केलेली आहे. सुरुवातीस राज्यामधील अ,ब,क व ड वर्गातील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार ग्रंथालयांचीच पुरस्कारासाठी निवड करण्यात येत होती. सन १९८६-८७ पासून या योजनेचा विस्तार करण्यात येऊन शहरी व ग्रामीण अशा दोन भागातील अ,ब,क आणि ड वर्गातील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण आठ उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना पुरस्कार दिले जात आहेत. सन२००२ -०३ या वर्षापासून शासनाने पुरस्काराच्या रकमेत भरीव वाढ केली आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ,ब,क, आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना आता अनुक्रमे रु.५० हजार, रु.३० हजार, रु.२० हजार, व रु. १० हजार असे रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह समारंभापूर्वक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते.ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये क्षेत्रातील कार्यकर्ते व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून भारताततील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन् यांच्या नावांने पुरस्कार देण्याची नाविन्यपूर्ण योजना सन 1१९९४-९५ पासून राज्यात नव्यानेच सुरु करण्यात येऊन राज्यस्तरावरुन प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना दिला जात होता. सन २००२-०३ पासून सदरहू पुरस्कारांच्या संख्येत व पुरस्काराच्या रकमेत शासनाने भरीव वाढ केलेली आहे. त्यानुसार प्रस्तुत पुरस्कार राज्यस्तरावरील कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु. २५,००० तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावरुन एकेक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु.१५,००० स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते.