मुंबई, विशेष प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी शासन संत गाडगेबाबांच्या विचाराने चालवेले जात असून समाजातील सर्व घटकांचा समान विकास साधण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मुंबईतील ओबीसी, बंजारा, बारा बलुतेदार समाजाच्या वतीने आयोजित मेळाव्यात देसाई बोलत होते. यावेळी बंजारा समाजाचे नेते हरीभाऊ राठोड, शंकर पवार, बालाजी शिंदे उपस्थित होते. देसाई म्हणाले की, वंचित समाजाच्या न्याय्य हक्कासाठी हरीभाऊ राठोड मागील २६ वर्षांपासून पोटतिकडीने संघर्ष करत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर दरवर्षी मेळावे घेऊन या समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक करत आहे. वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे ते नेते आहेत, असेही देसाई म्हणाले. शासन समाजातील सर्व घटकांचा समान विकास साधण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. असे देसाई यांनी स्पष्ट केले. उमेद अभियानाच्या खासगीकरणाबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्याशी चर्चा करुन त्यावर तत्काळ मार्ग काढण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.