मुंबई : मुंबईसह राज्यातील अन्य भागातील लेप्टोच्या रुग्णांचे सर्वेक्षण करून उपचाराबाबत मार्गदर्शक सुचना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ठळकपणे लावाव्यात. औरंगाबाद व लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात स्वाईन फ्लू चाचणी प्रयोगशाळा सुरू कराव्यात. गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामीण भागातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे दिले.मंत्रालयात साथ रोग नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी लेप्टो, स्वाईन फ्लू, डेंग्यू, गॅस्ट्रो याबाबत सुरू असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला.राज्यात यावर्षी 136 जणांना लेप्टोची लागण झाली असून त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 हजार 134 डेंग्यूचे रुग्ण असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 42 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी राज्यात 20 ठिकाणी गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे.राज्यातील एक लाख 28 हजार लोकांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत देण्यात आली आहे.
महानगरपालिका क्षेत्रांत आणि संपूर्ण राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण करावे त्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृती करावी, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. लातूर, औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात स्वाईन फ्लू चाचणी प्रयोगशाळा तातडीने सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना दिले.स्वाईन फ्लू प्रतिबंध लसीकरणासाठी गरोदर मातांच्या तपासणीच्या प्रोटोकॉलमध्ये या लसीकरणाचा समावेश करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ऑगस्टमध्ये मोहीम सुरू करण्यात आली असून राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थांना डेंग्यूबाबत जाणीवजागृती केली जाणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. गॅस्ट्रोचा उद्रेक राज्यात 12 ठिकाणी झाला असून तो रोखण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासणी मोहीम सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, संचालक डॉ.संजीव कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.