रत्नागिरी : गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविण्यात यश आलं आहे. आज (सोमवार) सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. काही पर्यटक पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात ओढले गेले. त्यांना गणपतीपुळे येथे तैनात जीवरक्षकांनी सुखरूप बाहेर काढले. नीलम विनायक जौजाळ (26, रा. इस्लामपूर, सांगली), विनायक जौजाळ (36), सुरेश तायडे (32, अंधारी, ता. सिलोर, औरंगाबाद) अशी या तिघांची नावं आहेत.
गणपतीपुळे इथे नीलम विनायक जौजाळ आणि विनायक जौजाळ फिरण्यास आले होते. त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. मात्र जौजाळ पतिपत्नी समुद्रात पोहत असताना अचानक खोल पाण्यात ओढले गेले. त्यांना वाचवण्यासाठी सुरेश तायडे यांनी धाव घेतली. मात्र त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागले. यावेळी येथे तैनात असलेल्या जीवरक्षकांनी पाण्यात धाव घेतली. त्यांनी तिघांनाही पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. या कार्यवाहीत जीवरक्षक अनिकेत राजवडकर, आशिष माने, मयुरेश देवरूखकर, अक्षय माने यांच्यासह मोरया वॉटर स्पोर्टस अँड बीच असोसिएशनचे सदस्य यांनी सहभाग घेतला होता.