
रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मंदिरात अंगारक चतुर्थीनिमित्त आज श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज पहाटे साडेतीन वाजल्यापासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.
अंगारक चतुर्थी म्हटलं की गणपतीपुळे परिसराला जत्रेचं स्वरूप येतं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळे इथे येत असतात. आज पहाटे साडे तीन वाजल्यापासूनच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते. गणपतीची पूजा आणि आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, मिरज सातारा या परिसरातून हजारोंच्या संख्येने भाविक आज गणपतीपुळेच्या मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी सागरी महामार्ग आणि मंदिर परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अनिरुद्धाज अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंट यांच्याकडूनही सेवा बजावण्यात येत होती. भाविकांच्या शिस्तीत रांगा लावणे, एखाद्या भाविकाला दुखापत झाल्यास मेडिकल सेवा पुरविणे अशा सेवा अनिरुद्धाज अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंट यांच्याकडून बजावण्यात येत होत्या. गेली दहा ते बारा वर्षे हे काम या अनिरुद्धाज अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंट विनामूल्य केलं जातं. आज दिवसभर 100 आपत्कालीन स्वयंसेवक कार्यरत होते.