मुंबई: सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी दरवर्षी वाढत असलेली गर्दी पाहता आगीच्या घटना टाळण्यासाठी “फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया” या सेवाभावी संस्थाने आयोजित केलेल्या सेफ्टी व सिक्युरिटी अवॉर्डमध्ये अंधेराच्या राजाने पहिला, गणेश गल्लीच्या मंडळाने दुसरा तर टिळक नगर (चेंबूर) सह्याद्री मंडळाने तिसरा क्रमांक मिळविला आहे. वांद्रे पूर्व येथील एम.आय.जी क्लब मध्ये पुरस्कार नुकताच पार पडला. पुरस्कार सोहळ्याला केंद्र सरकारच्या नागरिक सुरक्षा मंत्रालयाचे अग्नी सुरक्षा सल्लागार डी. के शामी, मुंबई पोलीस दलातील आईपीएस कृष्ण प्रकाश आणि मुंबई अग्नीशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रभात रहांगदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सेफ्टी व सिक्युरिटी ऑडिट करण्यासाठी यंदा २५० मंडळांनी नाव नोंदविले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५० मंडळाची वाढ झाली आहे. योग्य स्पॉटला सीसीटीवी लावणे, आग विझवण्याच्या साधनांची तपासणी, मेटल डिटेक्टर सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत उपाय करण्याचे मंडळातील कार्यकर्त्यांना मॉक ड्रील देणे अशा अनेक बाबींचा विचार करून हे सेफ्टी ऑडिट राबविले जाते.
फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष अश्विन ईजंतकर यावेळी बोलताना म्हणाले की, संस्था २००२ सालापासून फायर प्रोटेक्शन, लाइफ सेफ्टी, सिक्युरिटी, बिल्डींग ऑटोमेशन, लॉस प्रिवेंशन आणि रिस्क मॅनेजमेंट या क्षेत्रात सरकारी संस्थांसोबत काम करीत आहे. मुंबईत दोन हजारहुन अधिक गणेश मंडळे असून दरवर्षी गणेशमूर्ती पाहण्यासाठी पर्यटक व भाविकांची गर्दी वाढतच आहे. गेल्या सहा महिन्यात मुंबईत सार्वजनिक दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे अशातच सार्वजनीक गणेशोत्सव येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता हे एक यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान असते. आमच्या संस्थेची संपूर्ण भारतभर २० हुन अधिक चॅप्टर असून मुंबईतील या सामाजिक उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून पहिल्या वर्षी ४० मंडळांनी यात सहभाग घेतला होता.
जागतिक नकाशावर मुंबई ही शहर नावाजलेले आहे व या शहराच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा महत्वपूर्ण उपक्रम राबवीत असून गणेश मंडळाकडून याला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. प्रथम क्रमांकास १ लाखाचा चेक व ट्रॉफी तर दुसऱ्या क्रमांकास रुपये ७५ हजार व ट्रॉफी तर तिसऱ्या क्रमांकास रुपये ५० हजार व ट्रॉफी असे या पुस्काराचे स्वरूप असते. याविषयी अधिक माहिती देताना संस्थेच्या इव्हेंट आणि मार्केटींग कमिटीचे सदस्य आर्किटेक्ट श्रेयश सरमळकर म्हणाले, “मुंबईतील गणेशोत्सवामध्ये आलेल्या भाविकांची सुरक्षा हा आमच्या संस्थेचा प्राधान्यक्रम असून भाविकांना उत्तम प्रकारे सुरक्षितता देणाऱ्या गणेश मंडळाना आमची संस्था रोख रक्कम व पुरस्कार देऊन त्यांचे सामाजिक मनोबल वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. ”
२९ ऑगस्ट ला झालेल्या मुंबईत झालेल्या महाप्रलयामुळे अनेक गणेश मंडळात पाणी तुंबले होते परंतु आगीच्या कोणत्याही घटना घडल्या नाहीत ही खरोखच सामाधानीची बाब आहे. अनेक गणेश मंडळे या ऑडिट साठी स्वतः हुन पुढाकार घेत आहेत. जी गणेश मंडळे सुरुवातीच्या काळात ३ ते ४ सी सी टीवी कॅमेरा वापरीत होती तीच मंडळे आता २५ ते ४० कॅमेराचा वापर करीत आहेत. आमच्या मार्गदर्शनाखाली अनेक मंडळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आग विझविण्यासाठी लागणाऱ्या साहित्य कसे हाताळावे, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत काय करावे तसेच विमा सुरक्षा अशा अनेक उपयुक्त बाबींचा समावेश केला आहे. या वर्षी २ सप्टेंबर पर्यन्त २०१७ पर्यंत मुंबई अग्नीशमन दल, मुंबई पोलिस, विद्युत तज्ञ, फायर सुरक्षा तज्ञ, सीसी टीवी कॅमेरा तज्ञ व आर्किटेक्ट यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पूर्ण केली अशी माहिती फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे सचिव जितेंद्र महनोत यांनी दिली.