
कोकणाला जवळपास 720 किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जवळपास 400 गाव कोकण किनारपट्टीलगत आहेत. तर 184 मासेमारी बंदरे आहेत. लाखो जणांची उपजीविका ही मासेमारीवर आहे. समुद्र, धरण, नदी, खाड्या अशा सर्व पातळीवर मत्स्यशेतीची सर्वाधिक संधी फक्त कोकणाला आहे. त्यामुळे कोकणातच खऱ्या अर्थाने मत्स्य विद्यापीठ स्थापन करावे, असा मुणगेकर समिताचा अहवाल आहे. परंतु शासनाने आजतागायत त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच कोकणात असलेले एकमेव मत्स्य महाविद्यालय देखील नागपूरच्या महाराष्ट्र पशू, मत्स्यविज्ञान विद्यापीठाला (माफसू) संलग्न करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. यावरून आता राजकारण तापू लागलं आहे. या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. त्यातच युवा सेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय नागपूर विद्यापीठाशी संलग्न करू नये, हा निर्णय सरकारने मागे घ्यावा. अन्यथा युवा सेनेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि इथल्या कर्मचाऱ्यांसाठी युवा सेना स्टाईलने आंदोलन छेडू असा इशारा युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी तुषार साळवी यांनी दिला आहे.