नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, प्रसिद्ध कवी, स्वातंत्र्यसैनिक, मुत्सदी राजकारणी, उत्तम वक्ते आदी विविध विशेष गुण-पुरस्कारांनी देशाच्या राजकारणावर प्रदिर्घकाळ ठसा उमटविलेले अटलबिहारी वाजपेयी यांचे आज गुरुवारी निधन झाले. मॄत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात ते उपचार घेत होते. संध्याकाळी ५.५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला आहे. देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारतीय राजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. ते अविवाहित होते.
त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे नऊ आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजपा कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच काही काळ त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते. ते अविवाहित होते. राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. पुढे ते श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला.
भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्य़ात आणि हा पक्ष देशभरात पसरवण्यात अटलबिहारी वाजपेयी यांची मुख्य भूमिका राहिली होती.