दोडामार्ग येथे जनजागृती मोहिमेला प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी – केवळ मतदार म्हणून जगू नका. घटनेने दिलेले नागरिकत्वाचे हक्क वापरून स्वतःच्या अस्तित्वाचा लढा द्या. आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल, असा इशारा साखळी (गोवा) येथील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी रमेश गांवस यांनी दोडामार्ग येथे दिला.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका संपूर्ण वगळला आहे. त्याचा समावेश करावा, या मागणीसाठी ‘घुंगुरकाठी सिंधुदुर्ग’ने ‘वनश्री फाउंडेशन’ आणि पर्यावरणप्रेमींच्यावतीने सहकार्याने दोडामार्ग बाजारपेठेत जनजागृती आणि स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी श्री. गांवस बोलत होते. यावेळी ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, ‘वनश्री’चे अध्यक्ष संजय सावंत, ॲड. सोनु गवस, ॲड. निलांगी रांगणेकर सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. प्रवीण नाईक, उदय पास्ते, सतीश गवस, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, दीपक गवस, नंदकुमार गावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मोहिमेच्या सुरुवातीला श्री. सतीश लळीत यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. गोव्यातील लोहखनिज खाणींमुळे झालेल्या पर्यावरण विध्वंसाविरोधात यशस्वी लढा दिलेले श्री. गांवस पुढे म्हणाले की, खाणींमुळे होणारे भयानक दुष्परिणाम गोमंतकीय जनता भोगते आहे. खाणींचा फायदा फक्त मुठभर धनिकांना होतो. यात गोव्यातील अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. न्यायालयीन लढ्यामुळे गोव्यातील खाणी बंद झाल्या. यामुळे खाणमालकांची वक्रदृष्टी आता निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आणि त्यातही दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यांकडे वळली आहे. कळणे खाण, सह्याद्रीमध्ये प्रचंड वृक्षतोड करुन होणारी रबरसारखी एकसुरी लागवड यामुळे आधीच या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. खाणमालकांना मोकळे रान मिळावे, यासाठी केंद्राने आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका वगळला आहे. हे षडयंत्र वेळीच लक्षात घ्या.