रत्नागिरी : मेकॉलेच्या बैलबाजारामुळे भारतीयांनी विचार करणे सोडले आहे. 1100 वर्षे इंग्रज ग्रीकांच्या गुलामगिरीत होते. हा इतिहास न शिकवता इंग्रजांनी अर्ध्या जगावर कसे राज्य केले याचा इतिहास इंग्लंडमध्ये शिकवला जातो. भारताचाही इतिहास उज्ज्वल आहे. पण चंद्रगुप्त मौर्य, विक्रमादित्य, राणाप्रताप, गुरु गोविंदसिंह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास फारसा सांगितला जात नाही. हा इतिहास सकारात्मकपणे युवा पिढीपर्यंत नेला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. पु. वा. फाटक यांच्या 77 व्या स्मृतीदिनानिमित्त फाटक हायस्कूलमध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिक्षण आणि आजची युवा पिढी यावर त्यांनी सकारात्मक विचार मांडले.डॉ. शेवडे म्हणाले की, भारत या शब्दाचा अर्थ तेजाच्या उपासनेत नित्य रत असलेला. आपण सारे तेजाचे उपासक आहोत. पण तसे वागत नाही. अंदमानमधून येताना ऑस्ट्रियाच्या एका तज्ज्ञाने मला विचारले की तुम्ही इंग्रजांना घालवलेत पण त्यांचा वेष ठेवलात, भाषा शिकवता. यावर मी उत्तर देऊ शकलो नाही. ब्रिटन ओलांडून फ्रेंच देशात गेलो तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही गुलामांची भाषा बोलत नाही. आपल्याकडे काही नव्हते, इंग्रजांनी शिक्षण आणले असेच शिक्षण दिले जाते. वास्तविक भारतात तक्षशिला विद्यापीठ 1400 वर्षे सुरू होते. त्यानंतरचे नालंदा विद्यापीठही शेकडो वर्षे चालले. खिलजीच्या आक्रमणावेळी तिथल्या 9 मजली ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ जाळून टाकण्यात आले. भारतात सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे. भारताच्या सुवर्ण इतिहासाची माहिती सकारात्मकरित्या सांगितली पाहिजे.ते म्हणाले की, शिक्षकांना विद्यार्थी कधीही भेटला तरी तो नमस्कार करतो. हे पावित्र्य असलेले क्षेत्र असून सुसंस्कारित पिढी घडवण्याची सर्वाधिक जबाबदारी शिक्षकांची आहे. अर्थात आधुनिक युगातील मर्यादा पेलूनचे हे कार्य करता येईल. आजची मुले वाया जाणार नाहीत व उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांचा सुकाणू योग्य दिशेला फिरवण्यासाठी मार्गदर्शन दिले पाहिजे. शिक्षकांकडे अवांतर वाचनाची पुस्तके नसतात. आजचा विद्यार्थी संगणक युगातील असल्याने अद्ययावत आहे. त्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी शिक्षकांनीही अपडेट राहिले पाहिजे. मेकॉलेच्या बैलबाजारामुळे भारतीयांचे मेंदू कसलाच विचार करत नाहीत. दुसरा काय म्हणतो ते कॉपी-पेस्ट केले जाते. बारावीचे शिक्षण घेतलेल्या मुलाचे काय भवितव्य आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण अनेक जण घेत आहेत. पण त्यांना नोकर्या नाहीत. कारण संशोधन वृत्तीला उत्तेजन दिले जात नाही. डॉ. शेवडे यांनी सांगितले की, इतिहासकाराला जात नसते. पण जातीयवादी मंचावरून विखारी भाषणे देणारे इतिहासकार समजू लागले आहेत. आज भाषेलासुद्धा जातीचे लेबल लावले जात आहे. मुलांना इंग्रजी माध्यमाकडे वळवले जाते. मातृभाषेतून शिकणारा विद्यार्थी सर्वाधिक यशस्वी होतो. त्यामुळे डोकं चालवून आपल्या मुलांना मराठी माध्यमातील शाळांमध्येच पाठवा.
या वेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, सचिव सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापिका सौ. शुभांगी वायकूळ उपस्थित होत्या. श्री. आग्रे यांनी डॉ. शेवडे यांचा परिचय करून दिला. उपमुख्याध्यापक श्री. लेले यांनी आभार मानले.