रत्नागिरी (आरकेजी): डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आज रत्नागिरी शहरात महास्वच्छता अभियान राबवले. भारत सरकारचे स्वच्छतादूत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशानुसार व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी केली. यामध्ये नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
शहरातील ११ शासकीय कार्यालये व साळवी स्टॉप ते एसटी बसस्थानक असा आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छता करण्यात आली. तब्बल १५० टन ओला कचरा व ५० टन सुका कचरा गोळा करून पालिकेच्या ताब्यात देण्यात आला. गांधी जयंतीनिमित्त आज सकाळी ७ ते ११ या वेळेत २५०० सदस्यांनी स्वच्छता मोहीम संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा सत्र न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व मुख्यालय, उत्पादन शुल्क, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बसस्थानक, रेल्वेस्थानक आवारासह भाट्ये समुद्रकिनार्यावर अभियान राबवले. शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस, नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी यात भाग घेतला.