अलिबाग : चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य-समता, न्याय आणि बंधूता या विचारांची चेतना दिली. या विचारांनुसार मार्गक्रमण करुन देश प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे येथे 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला होता. या क्रांतीकारी घटनेच्या आठवणी जागवण्यासाठी महाड येथे आज चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या विविध भागातून हजारो लोक अभिवादन करण्यासाठी आले होते. यानिमित्त सकाळपासून महाड येथील चवदार तळे, क्रांती स्तंभ येथे व तेथेच असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला जवळ अभिवादनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले हे होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष थुल, समाज कल्याण खात्याचे सहसचिव डिंगळे, उपायुक्त बाळासाहेब सोळंके, महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, महाड तहसीलदार चंद्रसेन पवार आदी उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा विचारच देशाला पुढे प्रगतीपथावर नेईल. डॉ. बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न बार्टी ही संस्था करत असून या संस्थेमार्फत विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कामही करत आहे. याच माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाड येथील हे क्रांतीकारी स्मारकही राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी विकास करु असे बडोले यावेळी म्हणाले.