मुंबई अंडरवर्ल्ड असा शब्द जरी उच्चारला तरी धडकी भरते. इतकी दहशत ८०, ९० च्या दशकात अंडरवर्ल्डची मुंबईत होती. पुढे मुंबई पोलिसांनी संघटीत टोळ्या आणि त्यांचे युद्ध यांना मुळापासून नेस्तनाबुत केले. पोलिसांनी घेतलेल्या कडक भुमिकेमुळे टोळीयुद्धाने सतत धगधगणारी मुंबई शांत झाली. मात्र, या शहरावरचा अंडरवर्ल्डचा डाग कायम राहिला. याच संघटीत टोळ्यांचे म्होरके, त्यांच्या कारवाया, स्मगलिंग, टोळी युद्ध यामुळे मुंबापुरी कुप्रसिद्धीच्या झोतात राहिली. एक तरुण पिढी या गॅंगवारमुळे बरबाद झाली. नेमका हाच कुप्रसिद्धीचा इतिहास ‘एस. हुसेन झैदी’ यांनी डोंगरी ते दुबई’ या पुस्तकातून वाचकांसमोर आणला आहे. या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीला वाचकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. याच पुस्तकाचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे.
‘एस. हुसेन झैदी’ यांनी गुन्हेविषयक बातम्यांचे वार्तांकन करत असताना जे अनुभवले. नंतर त्यांनी त्याचा सखोल अभ्यास करून गुन्हेगारी जगाचा आढावा ‘डोंगरी ते दुबई’ पुस्तकातून वाचकांसमोर उपलब्ध केला आहे. गुन्हेगारी जगताची सुरुवात १९५० पासून ते १९९० नंतरची रस्त्यावरील टोळीयुद्ध आणि त्यानंतरचा त्यांचा विस्तार त्यांनी अत्यंत बारकाईने मांडला आहे.
त्या काळात भायखळा हे मुंबईतील गुन्हेगारीचे केंद्र बनले होते. अलाहाबादी गॅंग, कानपुरी गॅंग, रामपुरी गॅंग, जॉनी गॅंग या टोळ्या उदयाला आल्या होत्या. यात नन्हे खान, वहाब पहिलवान, चिंका दादा ही नावे कुविख्यात झाली. रामपुरी चाकूचा शोध याच टोळीयुद्धातूनच पुढे आला.
अंडरवर्ल्ड मधील मिडास राजाच्या आगमनाने गुन्हेगारी जगताला प्रसिद्धी मिळाली. हाजी मस्तान असे त्या मिडास राजाचे नाव होते. लहानपणी सायकल रिपेरिंगच्या दुकानात दिवसभर राबणाऱ्या मस्तानने ‘स्मगलिंग’ ची ओळख मुंबापुरीला करून दिली. मुंबईच्या समुद्रावर राज्य करणाऱ्या मस्तानने पुढे वरदराजन आणि करीम लाला या गुंडांशी हातमिळवणी केली. नंतर अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहीम कासकर याची इंट्री झाली आणि त्याने या क्षेत्राच चेहरामोहराच बदलून टाकला. त्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेने पठाण गॅंग, मस्तान बॅकफुटवर गेले.
‘डोंगरी ते दुबई’ हे पुस्तक भाग -१ आणि भाग – २ असं विभागण्यात आलं आहे. ज्यात आपल्याला सुरुवातीची मुंबई(१९५०-६०) तेव्हाच्या परिस्थितीची माहिती मिळते. चोरी- मारामाऱ्या यांपासून खून करण्यापर्यंतची गुन्हेगारी मानसिकता, त्यातली स्थित्यंतरे त्यात टिपण्यात आली आहेत. लेखक आणि क्राईम रिपोर्टींग याचा उत्तम मेळ ‘एस. हुसेन झैदी’ यांनी पुस्तकात साधला आहे. म्हणूनच, पुस्तकात काही ठिकाणी लेखक असे प्रसंग उभे करतो की ते वास्तवाला धरून असल्याने त्यात कोणताही कल्पना विलास येत नाही. या प्रसंगातून पुढे येणारं नाट्य, वाचकाला पुढे होऊ घातलेल्या परिणामांची कल्पना देत राहतं. बाशू दादाला दाऊदने दिलेले आव्हान असो, पठाण- दाऊद गॅंग मधील संघर्ष संपवण्याकरता मस्तानने घडवून आणलेला समेट, साबीर कास्करचा काटा काढताना आखलेली योजना यामुळे पुस्तक रंजक बनले आहे.
आणीबाणीच्या काळात गुन्हेगारांना जेरबंद केलं गेलं, पण त्यांचे मनसुबे काही वेगळेच होते. तुरुंगाच्या बंद खोल्यामध्ये सुद्धा असणारी कट- कारस्थाने याबाबतही माहिती देण्यात आली आहे. गिरणी कामगारांच्या संपाची, त्यांच्या मुलांची झालेली वाताहत अक्षरशः हेलावून टाकते. यातूनच ‘डॅडी’ उर्फ अरुण गवळी हे नाव पुढे येते. B .R. A गॅंगची दहशत. यात B म्हणजे बाबू रेशीम, R म्हणजे रमा नाईक, A म्हणजे अरुण गवळी. या गॅंगचा आवाका, छोटा राजन चा उदय ही सर्वच प्रकरणे वाचताना वाचकाच्या डोळ्यांसमोर जिवंत चलचित्र उभं करण्यात लेखकाने यश मिळवले आहे.
दाऊदने ‘डी’ कंपनीची पायाभरणी करताना त्याने टाकलेले डाव-प्रतिडाव. त्याचे दुबई पलायन, दाऊद – गवळी युतीचा अंत आणि त्यातून घडलेलं रक्तरंजित नाट्य अंगावर शहारा आणतो. मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटाचे कारस्थान आणि एका शहराची शोकांतिका समजून घेताना मुंबईची काळीकुट्ट बाजू आपल्यासमोर उभी राहते. गँगस्टर-अंडरवर्ल्ड-सुपारी-खून-सट्टा-मटका-स्मगलिंग-खंडणी- एन्काऊंटर या दुष्टचक्रांभोवती एकेकाळी मुंबई कशी फिरत होती, याचा विचार करताना आता खूप सुखी जीवन जगत आहोत. असे वाटत राहते.
‘डोंगरी ते दुबई’ यात दाऊदच्या काळ्या कारनाम्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. शहरातील गुन्हेगारांचा ६ दशकांचा थरकाप उडवणारा इतिहास आहे. डोंगरी, महमद अली रोड, ग्रँट रोड, भायखळा, सागरी मार्ग आदी मुंबईच्या परिसरांची नावे सातत्याने येत राहतात, त्यामुळे मुंबईचा परिसर डोळ्यांपुढे येत राहतो.
वर्चस्वासाठी रस्त्यांवर सुरु झालेली गुन्हेगारी साम्राज्याची सीमा डोंगरीपासून विस्तारात कशी देशाबाहेर दुबई आणि त्यानंतर कराची पर्यंत कशी पसरली हे समजून घेण्यासाठी ‘डोंगरी ते दुबई’ हे पुस्तक ज्यांना मुंबईच्या काळ्या बाजूबद्द्ल माहिती हवी आहे, त्यांनी जरुर वाचावे.
लेखक: झैदी हुसेन एस.
पुस्तकाच नाव : डोंगरी ते दुबई (मराठी अनुवाद)
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने : ४२८
किमत : ३५०