डोंबिवली, (प्रशांत जोशी) : पूर्वेकडील औद्योगिक विभागातील खंबाळपाडा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मार्बल व्यापारी ललित संघवी यांचा मृत्यू झाला. या घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी करत धारेवर धरले. मात्र अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकत टोलवाटोलवी करण्यावर भर दिला. यामुळे संतापाचा भडका उडाला आहे.
ललितच्या मृत्यूविरोधात आज डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घरडा सर्कल परिसरात निदर्शनं करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. एमआयडीसी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात मनसे, भाजप, शिवसेना, आरपीआय पदाधिकारीही सहभागी झाले होते. यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी, कल्याण डोंबिवली महापालिका, पीडब्ल्यूडी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्डे आणि त्यांच्या दुरुस्तीबाबत जाब विचारला. परंतु त्यावेळी सर्व शासकीय यंत्रणांनी आपापली जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोटं दाखवली. त्यामूळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडसावून काम जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी भाजप नगरसेवक महेश पाटील, मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते प्रकाश भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक विश्वनाथ राणे, आरपीआयचे माणिक उघडे आणि व्यापारी सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया :
ललित संघवीचा मृत्यू होऊन आठवडा उलटला तरी कोणत्याच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. जैन कुटुंबियांना आर्थिक भरपाई मिळावी आणि दोषींवर कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडू. – मनोज घरत, मनसे शहराध्यक्ष
कल्याण डोंबिवली महापालिकेत गावे समाविष्ट केल्यानंतर तेथील रस्ते व इतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेला याबाबत औद्योगिक विभागाने पत्रव्यवहार ही केला आहे – सुभाष तुपे, अधीक्षक अभियंता एमआयडीसी
कल्याण डोंबिवली महापालिकेत गावे समाविष्ट करण्यात आली असली तरी शासनाने काही निर्णय अद्याप घेतले नाहीत. अनेक बाबी अद्याप त्यांनी पालिकेकडे हस्तांतरीत केलेले नाहीत. पालिका आयुक्तांनी त्यांना सदर रस्ते सुस्थितीत करून मग हस्तांतरीत करण्यास सांगितले आहे – राजेश मोरे, सभागृह नेते