
डोंबिवली,(प्रशांत जोशी) : ग्रामीण विभागातील कल्याण-शिळ रोडवरील लोढा हेवन परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. कुत्र्यांनी या परिसरातील बालिकेवर हल्ला केला. याप्रकारामुळे येथे भितीचे वातावरण आहे.
शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या माही सिंग या 8 वर्षीय बालिकेवर अचानक 5 ते 6 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.अंगावर धावून त्यांनी तिचे लचके तोडले. हा प्रकार पाहताच तेथील लोकांनी कुत्र्यांच्या तावडीतून तिची सुटका केली आणि ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे स्थानिक लोक संतापले आहेत. भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास मोठे आंदोलन करु असा इशारा स्थानिक लोकांनी दिला आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे.याच परिसरात गुरुवारी श्वेता मेहरा या महिलेवर 7 ते 8 भटक्या कुत्र्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. महिलेने प्रसंगावधान दाखवून स्वत:ची सुटका करून जीव वाचवला. झटापटीत महिलेचा महागडा मोबाईल फुटला. घटनेत चंद्रेश शर्मा यांनी गेल्या महिन्यातील 27 तारखेला या विषयाचे एक पत्र प्रशासनास पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. शहर तसेच ग्रामीण विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रात्रपाळी करून येणाऱ्या चाकरमान्याना रात्री घर गाठणे कठीण होत आहे. प्रशासनाने या विषयी लक्ष घालावे आणि त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

















