
बीईएस एक्स्पोचे उद्घाटन करताना माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड.
नवी दिल्ली : डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्व वयोगटातील, प्रांतातील आणि विभिन्न आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या सर्वांना समान संधी मिळेल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केला.
उत्तम सेवा देण्याबरोबरच पारदर्शकता सुनिश्चित केल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत डिजिटल तंत्रज्ञानामुळे लाभ पोहोचत आहे, असे ते म्हणाले. उपग्रह प्रसारणावरील २३ व्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे बीईएस एक्स्पो २०१७ चे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. खासदार सुभाष चंद्रा आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यावेळी उपस्थित होते.
डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विपुल संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच अवैध प्रसारणासारखी आव्हाने निर्माण केली आहेत, ज्यावर नावीन्यपूर्ण तोडगा काढण्याची गरज आहे असे ते म्हणाले. सरकार डिजिटायझेशनप्रति कटिबध्द असून काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात डिजिटल भारत कार्यक्रमासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.