मुंबई : रायगड जिल्ह्यात दिल्ली- मुंबई कॉरीडॉर अंतर्गत दिघी प्रकल्प होत आहे. प्रकल्पासाठी तेथील गावातील जमिनींचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे, असे आमदार निलम गोऱ्हे यांनी रायगड जिल्ह्यातून भेट घेण्यासाठी मुंबईत आलेल्या शिष्टमंडळाला सांगितले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ मुंबईत आले होते. सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांचा त्यात सहभाग होता. गोऱ्हे यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायमच आहे. या भागातील शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावरील शिक्के काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन कदम यांनी या कार्यकर्त्यांना यावेळी दिले.