रत्नागिरी : तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे सध्या जिल्ह्यातील पाणीस्रोत झपाट्याने खाली होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ४५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचं समोर आलं आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वाधिक पाऊस पडूनही जिह्यात सध्या पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. दुर्गम भागातील खेड, तालुक्यातील गावांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. प्रशासनाकडे त्या गावांना पाणी पुरवठा केला जावा, यासाठी केलेल्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणी पुरवठा करूनही येथील ग्रामस्थांची पाणी मिळवण्यासाठी मोठी वणवण सुरू आहे. रणरणत्या उन्हाचा कडाका अधिक गडद होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने या प्रकल्पातील पाणीसाठ्याच्या घटत्या पातळीकडे येथील पाटबंधारे विभागामार्पत कटाक्षाने लक्ष ठेवले जात आहे. आगामी काळात अशा प्रकारे तापमान वाढत राहिल्यास पाणीसाठ्यांवर मर्यादा येण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ३० मार्चच्या पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४५ लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये १११ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा म्हणजेच ४५.८३ टक्के इतका शिल्लक होता. या पाणीसाठ्यात वाढत्या तापमानामुळे होत असलेल्या बाष्पीभवनाचा परिणाम २० एप्रिलच्या अहवालानुसार ३ टक्क्यांनी पाणीपातळीत घट झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.