रत्नागिरी, (आरकेजी) : देशातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्यास आहे, त्यांना पायाभूत सोयी-सुविधा मिळणे आवश्यक आहे. येत्या काळात देशातील सर्व ग्रामपंचायती मध्ये पायाभूत सुविधा निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.
निर्मल ग्रामपंचायती मध्ये राज्यात प्रथम क्रमांक आलेल्या तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त ग्रामपंचायत अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या दापोली तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीत गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्रामपंचायतींना २९ प्रकारचे विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांचा उपयोग करुन ग्रामपंचायत आपले उत्पन्न वाढवून त्याचा उपयोग ग्रामपंचायतीच्या प्रगतीमध्ये करु शकते. येत्या काळात देशातील सर्व ग्रामपंचायती मध्ये पायाभूत सुविधा निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सशक्त ग्रामपंचायतीच्या निर्मितीमध्येच देशाचा विकास आहे, असेही ते म्हणाले. यावेळी राज्यपालांनी जालगाव येथील अंगणवाडीस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आमदार संजयराव कदम, दापोली पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत बैंकर, जालगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती रश्मी जालगावकर, राज्यपाल यांचे सचिव वेणू गोपाळ रेड्डी, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
काजू प्रक्रिया उद्योगास भेट
सहकार भारती काजू प्रक्रिया सहकारी संस्था वाळणे येथे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी भेट दिली. यावेळी सहकार भारती काजू प्रक्रिया सहकारी संस्थेचे संचालक धनंजय यादव यांनी काजू प्रक्रीये विषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक तसेच वाळणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.