
रत्नागिरी :रत्नागितल्या मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा भूस्खलन झालं आहे. अतिवृष्टीमुळे मधलीवाडी खालचापाट येथे हे भूस्खलन झालं आहे. त्यामुळे इथले शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याठिकाणी दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, आणि आता भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन खचल्याने न भरून येणारे नुकसान झाले आहे . नदीचा प्रवाह बदलल्याने आणि जमिनीखालील पाण्याच्या अंतर्गत प्रवाहामुळे हा जमीन खचण्याचा प्रकार घडत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.२००६ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, त्यावेळी इथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं होते. तेव्हा ४ ते ५ एकर जमीन एकाचवेळी खचली होती. त्यामुळे येथील शेती , बागायती देखील उध्वस्त झाली . या प्रकारामुळं त्या भागात शेती करणेही लोकांनी सोडून दिले. त्या प्रकाराने सारी प्रशासकीय यंत्रणाही हलली होती. लगोलग भेटी देण्यात आल्या. अगदी भूवैज्ञानिक सतारावरूनही या प्रकारची दखल घेण्यात आली होती. रिंग लॅन्डस्लाईडचा प्रकार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून उपाययोजनेसाठी पाठवण्यात आला. सातत्याने पाठपुरावा करून त्याठिकाणी आपत्कालीन उपयोजना झाली काँक्रीट चा धुपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा बांधण्यात आले. त्यावर सुमारे १५ ते २० लाख खर्च झालेत. पण उपाययोजना करूनही सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा जमीन सुमारे १०० फूट लांब आणि १५ ते २० फूट खचली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत . अशीच जमीन खचत राहिल्यास हा धोका वाढणार आहे. त्यामुळे काही एकर शेतजमीन नष्ट होण्याची भीती आहे. जवळच भाटवडेकर तसेच वाडकरवाडी लोकवस्ती आहे. त्यामुळे हे ग्रामस्थ देखील चिंतेत आहेत. प्रशासनाने या प्रकारची गंभीर दाखल घ्यावी हि मागणी होत आहे. यापूर्वी केलेली उपाययोजना अर्धवट असून आणखी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे अन्यथा येथील शेतकरी उध्वस्थ होतील असे सांगितले जात आहे.