जालना : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शेतकर्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. तूरीच्या खरेदीवर राज्याचे राजकारण तापले असतानाच दानवे यांनी ते आणखी तापवण्याचा प्रयत्न केला. जालन्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवेंची जीभ इतकी घसरली की, एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात ‘साले’, असे म्हणत त्यांनी शेतकर्यांचा अवमान केला. दानवेंच्या या वक्त्यव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या मेळाव्यात भाजपाच्या एका कार्यकर्त्याने दानवेंना प्रश्न विचारला. तूर खरेदीबाबत लोकांना काय उत्तर द्यायचे? असा प्रश्न त्याने केला. यावर इतकी तूर खरेदी करूनही यांचे रडगाणे सुरूच आहे, दर नाही, दर नाही असली रडगाणी आता बंद करा, असा इशाराही दानवेंनी शेतकर्यांना दिला. तसेच कापूस, तूर आणि डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, असे म्हणत त्यांनी शेतकर्यांची अवहेलनाही केली.
आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत दानवे प्रसिध्द आहेत. नोटाबंदी केल्यानंतरही दानवे यांनी तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे द्या, मी बदलून देतो, असे वक्तव्य करत खळबळ उडविली होती.