
रत्नागिरी : रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनीटी हेल्थ क्लबच्या विद्यमाने आज रत्नागिरीत पहिली सायकल रॅली यशस्वी झाली. 300 विद्यार्थी व 100 रत्नागिरीकर नागरिकांनी या फेरीत सहभाग घेतला. आयटीआय- शिवाजीनगर ते हातखंबा व परत शिवाजीनगर या मार्गावर रॅली झाली. आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणार्या सायकल रॅलीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. असे उपक्रम दोन महिन्यांतून एकदा तरी व्हावे, अशी अपेक्षा सार्यांनी व्यक्त केली.
आयटीआय रोडवरील मंगळवार आठवडा बाजार येथे या रॅलीचा उद्घाटन सकाळी 6 वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी श्रीफळ वाढवून व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झेंडा दाखवून केले. त्यानंतर 100 नागरिकांनी हातखंब्याकडे कूच केले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर 300 विद्यार्थ्यांच्या रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले. या वेळी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते धरमसी चौहान यांनी रॅलीला झेंडा दाखवला.
रॅलीसोबत रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था 10 ठिकाणी केली होती. येथे सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे चिरायू हॉस्पीटलशेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा सायकलपटूंना दिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशीगंधा पोंक्षे, नितीन दाढे तसेच धन्वंतरी हॉस्पीटचे सर्व कर्मचारी, सामाजिक संस्थांनी या रॅलीचे उत्तम नियोजन केले होते. त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन, जाणीव फाउंडेशन, रोटरी क्लब, लायनेस क्लब, लायन्स क्लब, संस्कार भारती, मानवता संयुक्त संघ, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ, लेन्स आर्ट, बाबुराव जोशी गुरुकुल व अॅड. नानल गुरुकुल या संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. क्रेडाई, गद्रे मरीन्स, हिंद सायकल, कार्निव्हल, ट्रॅक्वीलीटी यांचे सहकार्य लाभले. सांगता कार्यक्रमात सहभागी मोठ्या व्यक्तींना मेडल्स देण्यात आली तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
शहरातील दुचाकी, चारचाकी व रिक्षांची भरपूर वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्यांवरून सायकलस्वारांना जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता स्वतंत्र ‘सायकल ट्रॅक’ करावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकार्यांनी त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले. आजची रॅली खूपच उत्साही वातावरणात झाली.
नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्वतः वीस किलोमीटरची रॅली पूर्ण केली. हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. स्वच्छ सुंदर रत्नागिरी प्रदूषणमुक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी इंधन बचत करणारी व फिटनेस राखणारी सायकल सर्वांनी चालवावी व ‘सायकल डे’ साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
सुदृढ आरोग्य, सुंदर शहर आणि वाढते इंधन दर यावर एकत्रित उपाय म्हणून सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्याकरिता क्लब स्थापन झाला. आजच्या रॅलीनंतर सभासद संख्या वाढू लागली आहे. दररोज सायकलिंग आणि दर रविवारी सायकल भ्रमण मोहीम सुरू करण्याचा मानस या क्लबचा आहे.