
पालघर : कोकणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली कष्टकर्यांचा लाल झेंडा फडकला. पालघर जिल्हा परिषद आणि ८ पंचायत समित्यांच्या निवडणुका काल पार पडल्या आणि आज ८ जानेवारीला त्यांचे निकाल जाहीर झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने २०२० मध्ये जिल्हा परिषदेच्या ६ जागा आणि पंचायत समित्यांच्या १२ जागा, अशा एकूण १८ जागा जिंकल्या आहेत. २०१५ सालच्या निवडणुकीत पक्षाने जिल्हा परिषदेच्या ५ जागा आणि पंचायत समित्यांच्या १० जागा, म्हणजे एकूण १५ जागा जिंकल्या होत्या. म्हणजे या खेपेस त्यात ३ जागांची भर पडली आहे.
या खेपेस आपण लोकसभा आणि विधानसभेच्या वेळची आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केला, पण तो बहुतेक ठिकाणी यशस्वी झाला नाही. तरीही पक्षाने जिंकलेल्या जागा वाढल्या हे विशेष.
तलासरी तालुक्यात जि.प.च्या ५ पैकी ४, आणि पं.स.च्या १० पैकी ८ जागा जिंकून पं.स.वर लाल बावटा पुन्हा एकदा फडकवला. १९६२ पासून गेली ५८ वर्षे तलासरी पंचायत समितीवर लाल बावटा अखंड फडकत आहे. असे दुसरे उदाहरण महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षाचे बहुधा नसावे.
डहाणू तालुक्यात जि.प.ची १ आणि पं.स.च्या २, जव्हार तालुक्यात जि.प.ची १ आणि पं.स.ची १ आणि विक्रमगड तालुक्यात पं.स.ची १ अशा जागा माकपने जिंकल्या आहेत. वाडा आणि पालघर तालुक्यातही पक्षाने काही जागा लढवल्या. काही जागा खूप कमी मतांनी पडल्या.
ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेच ही अतिमहत्वाची निवडणूक असताना देखील, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या मुंबईतील राष्ट्रीय अधिवेशनासाठीचा ७ लाख रुपयांचा फंड कोटा ठाणे-पालघर जिल्ह्याने ओलांडला, २७ डिसेंबरच्या मुंबईतील राज्यव्यापी महिला रॅलीत २,०००हून अधिक महिला उतरवल्या आणि २५,०००चा जमसंचा सभासदकोटाही पूर्ण करत आणला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सर्व विजयी उमेदवारांचे, विजयी होऊ न शकलेल्या उमेदवारांचे आणि लाल बावटा विजयी करण्यासाठी अहोरात्र काम केलेल्या पक्ष व जनसंघटनांच्या हजारों कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
डहाणूतील पक्षाच्या नवनिर्वाचित आमदाराप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून गेलेले पक्षाचे प्रतिनिधी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पक्षाच्या जिल्हा, तालुका व विभाग कमिट्या सर्वसामान्य जनतेची इमानेइतबारे आणि स्वच्छ चारित्र्याने सेवा करतील, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील आणि मुख्य म्हणजे जनतेच्या लढयांचे नेतृत्व जास्त प्रभावीपणे करून पक्ष व जनसंघटना जास्त बळकट, रेखीव आणि व्यापक करण्याचा जिवापाड प्रयत्न करतील, असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केला आहे.