Mumbai : मराठी संतांची शिकवण निःसंशयपणे लोक प्रबोधन आणि लोकजागरण करणारी एक प्रभावी चळवळ होती. महाराष्ट्राचे जनमानस सुसंस्कृत करण्यात संतानी फार मोठे योगदान दिले. त्यांनी चालवलेली परिवर्तनाची चळवळ ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. गेल्या काही वर्षात सत्तासोपानासाठी धर्म आणि राजकारण यांची सांगड घालून अधर्माची व परधर्मद्वेषाची विखारी व विषारी भाषा केली जात आहे व उन्मादी प्रदर्शन केले जात आहे. अशावेळी सर्वांगीण समतेसाठी मराठी संतांचा सातशे वर्षापासूनचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणे हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महाराष्टच्या वतीने महाराष्ट्राच्या परंपरेचा वेध घेणारी ‘ महाराष्ट्राचे दीपस्तंभ ‘ या ऑनलाईन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘मराठी संत आणि समाजप्रबोधन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माकपचे राज्य सचिव माजी कॉ. नरसय्या आडम होते. स्वागत व प्रास्ताविक माकपचे केंद्रीय सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी केले. त्यांनी महाराष्ट्राचा दीपस्तंभ असलेली वैचारिक आयुधे आजच्या विपरीत परिस्थितीत धैर्याने वाटचाल करण्याची प्रेरणा देतात हे स्पष्ट करत व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. ही व्याख्यानमाला महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि कार्ल मार्क्स जन्मदिन यानिमित्ताने ५ ते २४ मे अशी वीस दिवस दररोज सायंकाळी सात वाजता होणार आहे.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, मराठी संतसाहित्य हे जागतिक साहित्याचे अलौकिक लेणे आहे. संतांनी समाजाला स – हीत नेण्याचा प्रयत्न केला. संतांनी पारमार्थिक लोकशाही स्थापन केली. त्यांनी चमत्कारवाद नाकारला आणि कोणत्याही चमत्काराशिवाय महाराष्ट्राला जागे केले. संतांच्या भक्तिमार्गात कर्मकांडाला थारा नव्हता. संत खरेखुरे लोकप्रतिनिधी होते. लोकभाषेत त्यांनी आपले विचार मांडले. त्यातून धर्म व अधर्म विचार मांडत माणूस हीच जात आणि मानवता हाच धर्म हे स्पष्ट केले. चित्तशुद्धी व आत्मविकासाचा मार्ग सांगितला. माणुसकीवर आधारित कर्मयोग व नितीविचार सांगितला. संत ज्ञानेश्वर ते संत गाडगेबाबा यांच्या लेखनाची अनेक उदहरणे देत आणि त्याचा समकालीन संदर्भ सांगत प्रसाद कुलकर्णी यांनी या विषयाची सखोल मांडणी केली.
अध्यक्षीय भाषणात कॉ.नरसय्या आडम म्हणाले, मराठी संतांनी जातीव्यवस्था, अंधश्रद्धा यावर जे कोरडे ओढले. तसेच समाजाचे प्रश्न मांडले. ज्याचे महत्व आजही मोठे आहे. आभार कॉ. उदय नारकर यांनी मानले.
ही व्याख्यानमाला एकाच वेळी पक्षाच्या फेसबुक, युट्यूब व ट्वीटरसोबत मॅक्स महाराष्ट्र, इंडीजर्नल व विचारवेध या माध्यमांमधून देखील लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. आपण खालील लिंक्सवरून अवश्य सहभागी होऊ शकता.
https://www.facebook.com/maharashtra.cpim/
https://youtube.com/c/CPIMMaharashtra
https://www.facebook.com/MaxMaharashtra/
https://youtube.com/c/MaxMaharashtra
https://facebook.com/indiejournal/
https://youtube.com/c/Vicharvedhindia