मुंबई, (प्रशांत गायकवाड) : कोरोनामुळे आपण घरात बसलो आहोत. टीव्ही पाहतोय, त्यात कोरोनाने मृत्युचे आकडे वाढताना दिसताहेत. मृत्युचेही भय न बाळगता अनेक कोरोना योद्धे सामाजिक कार्य करत आहेत. वस्त्या पिंजून काढत आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा, शिधा मिळतोय की नाही, याकडे लक्ष देत आहेत. यापैकीच एक म्हणून जयंत दांडेकर सध्या विक्रोळीत सामाजिक कार्यात पुढे आहेत. त्यांचे वेगळेपण असे की, त्यांची ऊंची अवघी ‘साडेतीन’ फुट इतकी आहे. वयाच्या 57 व्या वर्षी सकाळी साडेसातला दांडेकर यांचे समाजकार्य सुरू होते, जे रात्रीपर्यंत सुरूच जेव्हा असते. क्षणभर विश्रांती मिळत असतानाच मध्येच मदतीसाठी फोन येतो, पुन्हा धावपळ. पण आता याची सवय झाल्याचे दांडेकर सांगतात.
संपूर्ण भारतात इतक्या कमी ऊंचीचा दांडेकर हे पहिलेच कोरोना योद्धा असावेत, असा दावा यानिमित्ताने केला जात आहे.
जयंत दांडेकर हे मनसेचे शाखा क्रमांक 118 चे शाखाध्यक्ष आहेत. जेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, प्रसिद्धी देऊ नका. मी काही वेगळे करत नाही आहे. मला फक्त माझे काम करू द्या, असे ते म्हणाले. त्यावेळी तुमच्या कामाची दखल घेणे आवश्यक आहे. तुमच्यापासून प्रेरणा घेऊन तरुण पिढी समाजकार्यात येईल, असे सांगितल्यावर ते कामाबद्दल बोलायला तयार झाले. महाराष्ट्र सैनिक म्हणजे मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता हा लढाऊच असतो, आदरणीय राज ठाकरे साहेबांचे आदेशच तसे आहेत, हे मात्र त्यांनी आवर्जून संगितले.
लॉकडाउन जाहीर झाले, तेव्हापासून नवनवीन आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. दररोज शेकडो नागरिकांचे फोन येतात. कोणाला डॉक्टरकडे जायचे असते. कोणाला शिधा हवा असतो. कोणाचे अन्य प्रश्न असतात. त्यामुळे हे दिवस धावपळीचे झाल्याचे दांडेकर सांगतात. तुमची ऊंची कधी कार्याआड येत नाही का? असे विचारल्यावर ते म्हणतात, ऊंची कमी जास्त असणे हे माझ्यासाठी महत्वाचे नाही आणि लोकांसाठीही नाही. या कठीण काळात लोकांचे काम होतेय ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
विक्रोळीत कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्याची भीती वाटत नाही का? यावर दांडेकर म्हणतात माझ्या विक्रोळीत कोरोनाचे रुग्ण वाढताहेत याची भीती वाटते. प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क घालणे गरजेचे आहे. मी फिरताना सुरक्षा कवच, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर यांचा वापर करतो.
आमचे महाराष्ट्र सैनिक धडाडीने काम करत आहेत. लॉकडाऊन मध्ये रुग्णालय, डिस्पेन्सरी हे काही ठिकाणी बंद होते. परंतु प्रभाग क्रमांक 118 चे महाराष्ट्र सैनिक यांनी त्या त्या डॉक्टर यांच्याशी संपर्क करून ते सुरू केले. रेशनसाठी ज्यांचा आर. सी. नंबर नव्हता आणि या लॉकडाऊन मुळे ते शक्य नव्हते अशा वेळेस अधिकारी वर्ग आणि दुकानदार यांच्याशी योग्य समन्वय साधून अनेक कुटूंबाना त्यांचे हक्काचे कार्डावरील शिधा उपलब्ध करून दिले. गरीब, गरजू, निराधार, अपंग, रिक्षा चालक अशा जवळ जवळ 350 कुटुंबाना तांदूळ गहू, डाळ, तेल, मीठ इत्यादी जिन्नस देऊन मदत केली. माहुल गाव येथील 300 कुटुंबाना महाराष्ट्र सैनिक यांनी अनेक जिन्नस देऊन मदत केली. दररोज स्थानिक पोलीस यांना पाणी आणि चहा याची व्यवस्था होते. त्याशिवाय मास्क, चेहरा सुरक्षा कवच, सॅनिटायझर, वाटप देखील केले गेले. बऱ्याच ठिकाणी सॅनिटायझेशन देखील करून घेतले. 2-3 दिवसापूर्वी परप्रांतीय यांना त्यांच्या प्रदेशात जाण्यासाठी योग्य ते सर्व सहकार्य प्रभागाने केले. तसेच काही रुग्णांना इस्पितळात दाखल करून घेतले जात नव्हते, त्यांना योग्य ती मदत करून दाखल करून घेतले. प्रभागात सायन रुग्णालय यांच्यावतीने करोना तपासणी अभियान घेतले, आदी कामांचा पाढाच दांडेकर यांनी वाचला.
स्वत: चालविली रिक्षा
एका रूग्णाला सर्दी ताप याचा त्रास होत होता. दांडेकर यांनी वेळ न दवडता त्याला उपचार मिळावेत याला प्राधान्य दिले आणि स्वत: रिक्षा चालवून त्या रूग्णाला दवाखान्यापर्यंत नेले. याबाबतचे छायाचित्रही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. माझे काम एकच वेळेवर मदत मिळायला हवी, त्यासाठी जिवाची पर्वा करायची नाही, असे दांडेकर सांगतात.