रत्नागिरी : रत्नागिरी शहरात राजीवाडा भागात एक इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून या पार्श्वभूमीवर प्रशासन या लगतचा तीन किलोमीटर भाग प्रतिबंधित करण्यात येणार असून त्यापुढील दोन किलोमीटर क्षेत्र बफर झोन करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यावेळी यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे आणि निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांची उपस्थिती होती.
बदललेल्या परिस्थितीला रत्नागिरीतील नागरिक लक्षात घेऊन घरातच थांबतील आणि विनाकारण बाहेर फिरणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतानाच वेळ आली तर राज्य राखीव दलाला पाचारण करावे लागेल आणि असे फिरणाऱ्यांवर यापुढील काळात सक्तीने कारवाई करण्यात येईल, असे सामंत यावेळी म्हणाले.
सदर इसम हा मुंबईहून रेल्वेने आला होता. त्याच्या सोबत प्रवास करणारे त्याचे कुटुंबीय आणि इतर सहप्रवासी यांची माहिती प्रशासनाने घेतली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या या रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणी झाली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत असेही सामंत म्हणाले.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा मेहनत घेत आहे. 12 मार्च नंतर जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांनी स्वतः तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. अशी तपासणी करून न घेणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.