मुंबई, 2 जून : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाचा पट्टयामुळे येत्या 12 तासात या क्षेत्राचे ‘निसर्ग’ चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. वाऱ्यांचा वेग 100 ते 110 किमी प्रतितास असणार आहे. 120 किमीपर्यंतही वाऱ्यांचा वेग पोहचू शकतो. 3 जूनच्या दुपारी चक्रीवादळ हरिहरेश्वर आणि दमणच्या दरम्यान अलिबागच्या दिशेने रायगड जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मुंबईपासून 430 किमी तर गोव्याच्या 280 किमी दूर आहे, अशी माहिती हवामान तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार दिली आहे.
पुढील 12 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या बदलामुळे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमूसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा जास्तीत जास्त वेग 100-110 किमी प्रतितास ते 120 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.