ठाणे : सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या ऋचा देव आणि आदित तांबे या बालवैज्ञानिकांच्या गटाच्या प्रकल्पाची राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत निवड झाली आहे. त्यांनी डासांचा दंश टाळण्यासाठी रसायनमुक्त औषध तयार केले आहे. याच शाळेतील नीया गडा आणि वंश अजमेरा या विद्यार्थ्यांच्या गटाचीही निवड झाली आहे. त्यांनी केसांना लावण्यात येणाऱ्या रंगाची निर्मिती केली आणि हा रंग अपायकारक ठरत नाही. डॉ. उषावती शेट्टी यांचे दोन्ही प्रकल्पांना मार्गदर्शन लाभले आहे. ऋचा देव, आदित तांबे, नीया गडा, वंश अजमेरा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसच्या राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातून 16 प्रकल्पांची निवड झाली होती. त्यापैकी 3 प्रकल्पांनी पुढील फेरीत धडक मारली आहे. त्यात सिंघानिया शाळेचे दोन प्रकल्प आहेत. तर एक प्रकल्प भगवती शाळेचा आहे. आता डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे.