मुंबई : भारतातील केमिकल अँड पेट्रोकेमिकल क्षेत्र फार्मास्युटिकल्स, कृषी, हायजिन व आरोग्यसेवा अशा अत्यावश्यक उत्पादनांसाठी विविध आवश्यक घटक देते. कोविड-19च्या साथीदरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आणि एकंदर देशाचे कल्याण यासाठी या क्षेत्राचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन, कोविड-19च्या साथीमुळे सध्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये सीअँडपीसी क्षेत्राच्या संपूर्ण मूल्यसाखळीला ‘अत्यावश्यक’ जाहीर करावे, असे मत केमिकल क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या इंडियन केमिकल कौन्सिल, या भारतातील सर्वात मोठ्या व सर्वोच्च संघटनेने व्यक्त केले आहे. भारतातील केमिकल उद्योग अन्य अनेक उद्योगांशी निगडित आहे आणि त्यामुळे हा अन्नधान्य, खाद्यतेल, औषधे, खते अशा अत्यावश्यक वस्तूंच्या मूल्यसाखळीतील अतिशय महत्त्वाचा उद्योग आहे.
केमिकल उद्योग हा उद्योगांचा उद्योग आहे आणि सध्या निर्माण झालेल्या साथीच्या वेगाने होणाऱ्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या जागतिक लॉकडाउनमुळे अडचणीत आला आहे. सीअँडपीसी क्षेत्रातील अनेक आवश्यक पुरवठा एक तर देशाच्या निरनिराळ्या ठिकाणी अडकला आहे किंवा उत्पादकांना उत्पादनाची परवानगी देण्यात आलेली असली तरी त्यांचे कामगार कामावर येऊ शकत नसल्याने या उत्पादकांना उत्पादन करणे अशक्य होत आहे.
इंडियन केमिकल कौन्सिलच्या मते, “केमिकल अविभाज्य भाग आहेत आणि आपल्या आधुनिक जीवनामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फार्मास्युटिकल्ससारख्या आवश्यक वस्तूंचा केमिकलशी थेट संबंध येतो. उदाहरणार्थ, पॅरासिटेमॉल या आवश्यक औषधाच्या निर्मितीसाठी बेन्झिन, सल्फर, कॉस्टिक, क्लोरिन, हायड्रोजन, नायट्रिक अॅसिड, सल्फरिक अॅसिड, अॅसेटिक अॅनहायड्राइड अशा केमिकलची गरज मोठ्या प्रमाणात भासते. बहुसंख्य सीअँडपीसी प्रकल्प सध्या बंद असल्याने अनेक पॅरासिटेमॉल प्रकल्पही नाइलाजाने बंद ठेवावे लागत आहेत. तसेच, पॉलिमर्स जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात आणि त्यांचा वापर कॅथेटर, ब्लट ट्रान्सफ्युजन पाइप, रक्ताची पिशवी, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) यामध्ये केला जातो. त्यामुळे, कृषी, पिण्याचे पाणी, अन्नधान्य, प्रोसेस-फ्लो यातील मोठा वापर लक्षात घेऊन प्लास्टिक डाउनस्ट्रीम उद्योगही अत्यावश्यक ठरवला पाहिजे. चीन, कोरिया, तैवान, युरोप व अमेरिका येथील केमिकल प्रकल्प आत्ताही सुरू आहेत, कारण तेथे केमिकलला अत्यवश्यक समजले जाते.”
जीवन वाचवणाऱ्या अनेक औषधांमध्येही याचा वापर केला जातो. ही औषधे मुख्य केमिकलच्या पुरवठ्याविना तयार करता येऊ शकत नाहीत. अन्नधान्य ही देशातील सर्वात अत्यावश्यक वस्तू अॅग्रोकेमिकल व खते यांच्या वापराविना उत्पादित करता येऊ शकत नाही. शेतीतील सिंचन प्रक्रियाही टिकाऊ व किफायतशीर पाण्याच्या पाइपच्या विना अडचणीत आली आहे.
या क्षेत्राच्या कार्याच्या दृष्टीने विचार करता, इंडियन केमिकल कौन्सिलने नमूद केले, “बहुतांश कंटिन्युअस प्रोसेसमध्ये विशिष्ट मिनिमम टर्नडाउन रेश्यो असतो, म्हणजेच प्रकल्प चालवू शकतू अशी रेटेड क्षमतेची किमान टक्केवारी असते. उत्पादनाच्या अनुसार ही टक्केवारी 50-80% इतकी असू शकते. तसेच, कंटिन्युअस प्रोसेस प्लांट सहज बंद किंवा सुरू करता येऊ शकत नाही.”
अन्य देशांतील देशांतर्गत मागणी लक्षणीय कमी झाली आहे आणि त्यामुळे निर्यातही घटली आहे. त्यामुळे साठा वाढतो आहे. भारतासारख्या देशांसाठी यामुळे धोका वाढतो आहे. अनेक देशांनी निर्यातीसाठी जाहीर केलेल्या सवलतींमुळे भारतातील उद्योगावरील ताण आणखी वाढणार आहे.
केमिकल क्षेत्र हे अत्यावश्यक म्हणून जाहीर करावे आणि ते लॉकडाउनमधून मुक्त करावे, अशी आयसीसीची शिफारस आहे. या क्षेत्राचे कार्य सुरळितपणे सुरू होण्यासाठी, आघाडीची व इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ केमिकल असोसिएशन (आयसीसीए) मान्यताप्राप्त भारतीय केमिकल उद्योग संघटना म्हणून आयसीसीने सीईएफआयसी (युरोप) व एसीसी (अमेरिका) यांच्या सहयोगाने सुरक्षित कार्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे साध्य केली आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुढील तत्त्वे समाविष्ट आहेत – कामाच्या ठिकाणी स्वच्छता व सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर आणि कोविड-19चे संक्रमण रोखणे, या सरकारच्या उद्देशाला अनुसरून सुरक्षित कार्याचा समावेश करणारी अन्य मार्गदर्शक तत्त्वे.
भारतीय केमिकल उद्योग नेहमी योग्य वेळी कृती करते आणि सध्याच्या या प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतरही आम्ही नव्या संधींमध्ये करू, असा विश्वास आहे. यामुळे, तसेच सातत्याने सहकार्य करणाऱ्या सरकारच्या अचूक वेळच्या पाठिंब्यामुळे अखेरीस भारतीय केमिकल उद्योग आणि भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे.