रत्नागिरी, प्रतिनिधी : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी हापूसला देखील मोठ्या प्रमाणातबसला आहे. यंदा हंगाम लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आंबा अधिक तयार होण्याची शक्यता असतानाच या वादळासह आलेल्या मुसळधार पावसाने झाडावरील आंबा खाली पडला. सुमारे चाळीस टक्के पिक वाया गेले असून बागायतदारांचे करोडोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचं आर्थिक गणित बिघडवलं आहे.
कोकणच्या हापूसची गोडी अगदी सातासमुद्रापार पोहचली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत निसर्गाचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. यावर्षी तर नोव्हेंबर महिन्यापासूनच नैसर्गिक आपत्तीचा आंब्याला करावा लागला. पाऊस लांबल्याने आधीच हंगाम लांबणीवर जाणार हे स्पष्ट होतं. त्यात सुरुवातीला तुडतुड्याने पालवीवर प्रादुर्भाव केला. त्यामुळे पालवीवर औषध फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतर 3 ते 4 वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात यावर्षी थंडी म्हणावी तशी पडली नाही, तर दोन वेळा 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान वाढलं. त्यामुळे आंब्याला जे पोषण हवामान लागतं, ते हवामान या हंगामात अजिबात पोषक नाही, त्यामुळे यावर्षी आंब्याचं पीक आधीच धोक्यात आलं. त्यात यावर्षी फक्त 25 ते 30 टक्केच उत्पादन.
पहिल्या टप्प्यात उत्पादन आलंच नाही . खऱ्या अर्थाने 10 एप्रिलपासून आंबा बाजारात दिसू लागला होता . गेल्या पंधरा दिवसात वाशी बाजारातही दिवसाला 30 हजार पेटी दाखल होत होती . मोहोर उशिराने आल्याने 15 ते 31 मे या कालावधीत उत्पादन हाती येईल अशी शक्यता होती ; मात्र अचानक अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळाने बागायतदारांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरले . रविवारी पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळाने धुमाकुळ घातला . दुपारी हे वादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले . गोल गोल फिरणाऱ्या ताशी 55 किलोमीटर वेगवान वाऱ्यांनी हापूसच्या बागाच्या बागा पिळवटून टाकल्या . झाडावरील आंबे टपाटप जमिनीवर कोसळत होते . काढणीयोग्य आंब्यापासुन ते कैरीपर्यंतची सर्वच फळं खाली पडली . बागांमध्ये सडाच्या सडा पहायला मिळत आहेत . बागांमधील झाडेच कोसळल्याने शेतकरी कायम उत्पन्नाला मुकला आहे. घोघावत्या वादळात शेतकरी हताश झाला होता . या वादळात शेवटच्या टप्प्यातील आंब्यांची पूर्णतः वाताहात झाली. आंबा पडून आपटल्यामुळे कॅनिंगलाही तो घेतला जाणार नाही . त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान बागायतदारांना सहन करावे लागणार आहे. एकूणच या वादळाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक बिघडवलं आहे..