मुंबई : अतिसार, जुलाब, कावीळ इत्यादी जलजन्य आजारांना कारणीभूत ठरणार्या इ-कोलाय बाधीत बर्फाचे प्रमाण ‘एम पूर्व’ विभागात ९७ टक्के असल्याचेही आढळून आल्यानंतर पालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या विभागात एप्रिल २०१७ मध्ये ९७ अतिसाराचे रुग्ण देखील आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एम पूर्व’ विभागात अनधिकृत फेरीवाले, सरबत विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावरील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. परिमंडळ पाच चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या कारवाईत १३ हजार ७०० किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती ‘एम पूर्व’ चे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.
‘एम पूर्व’ विभागाची लोकसंख्या ८ लाख ६ हजार ४३३ एवढी आहे. या विभागामध्ये गोवंडी, देवनार, मानखुर्द, तुर्भे , शिवाजी नगर, भारत नगर, गणेश नगर, सह्याद्री नगर, अयोध्या नगर, गौतम नगर, विष्णू नगर इत्यादी परिसरांचा समावेश होतो. या विभागासह महापालिकेच्या इतरही काही विभागांमध्ये अतिसार बाधीत रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे लक्षात आल्याने, तसेच याच भागांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ, पेयपदार्थ बर्फ नमुन्यांची व पाणी नमुन्यांची चाचणी केली असता त्यात इ-कोलाय जीवाणू बाधीत नमूने मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत खाद्यपदार्थ, पेयपदार्थ विक्रेत्यांविरोधात सुरु असलेली मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले होते.
१३५ लीटर सरबत, द्रव्य देखील नष्ट करण्यात आले आहे. तसेच अन्नपदार्थ, सडलेली फळे, निकृष्ट गोडपदार्थ इत्यादी देखील मोठ्या प्रमाणात जप्त करुन नष्ट करण्यात आले आहेत. तसेच ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचेही किलजे यांनी सांगितले.
उघड्यावरील अन्नपदार्थ, उसाचा रस टाळा
महापालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमून्यांमध्ये आढळून आलेले इ-कोलाय जीवणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी – सरबत – उसाचा, फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी – भेळपुरी सारखे पदार्थ खाणेही टाळावे असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.
ताजे अन्न खा
त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत; घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या – फळे स्वच्छ धुऊन खावेत, तसेच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.