
मुंबई : जगाला प्रज्ञा, करूणा आणि समता या तत्त्वांची शिकवण देणाऱ्या बुद्धांचा विचार सर्वांनी अवलंबल्यास विश्वशांतीचे ध्येय निश्चित साध्य करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून बुद्ध जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, सामाजिक सुधारणा होण्यासाठी मानवाने मनोधारणा बदलावी असे सर्वप्रथम बुद्धांनी सांगितले. सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वांतत्र्याचा पुरस्कार करतानाच समतेचा परिपूर्ण विचार बुद्धांनी मांडला. आजच्या विविध सामाजिक प्रश्नांची उत्तरे बुद्धाच्या शिकवणुकीत दडली आहेत. सर्वसामान्य माणसाचे परिवर्तन घडविण्याचा विचार त्यांनी सर्वत्र प्रसारित केला.















