
विनायक राऊत यांचं डिपॉझिट मला जप्त करायचं आहे : नारायण राणे
रत्नागिरी : खाईन तर तुपाशी,नाहीतर उपाशी, मला किमान अडीच लाख मतांनी विजय अपेक्षित आहे असं विधान केंद्रीय मंत्री, भाजपा नेते नारायण राणे केलं आहे.. चिपळूणमधल्या पेढांबे इथे झालेल्या सभेत ते बोलत होते. त्यामुळे एकप्रकारे महायुतीचे उमेदवार नारायण राणेच असणार असे संकेत यामुळे मिळत आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, पण भाजपने मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये सभांचा धडाका लावला आहे, सोमवारी चिपळूण तालुक्यातील पेढांबे इथे सभा झाली, यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला. विनायक राऊत यांचं डिपॉझिट मला जप्त करायचं आहे. ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत म्हणून खासदार विनायक राऊतने या भागात काम केलं नाही, काम न केल्यामुळे पन्नास टक्केहून अधिक निधी शिल्लक असल्याची टीका यावेळी राणे यांनी केली. तसेच जीवनात सगळी पदे रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली आहेत…त्यामुळे मला विजय अडीच लाख मतांनी अपेक्षित असल्याचं राणे यावेळी म्हणाले.
यावेळी राणे म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला नगरसेवक ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली, अशी आपली भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचे मोठे काम केले आहे. भारत अर्थव्यवस्थेत ३ ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्रिक करण्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्या. यामध्ये रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचा खासदार अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झाला पाहिजे. यामध्ये चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे मोठे योगदान असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खासदार राऊत यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, या भागातील विद्यमान खासदारांने आपला ५७ % खासदार निधी खर्च केलेला नाही. तर १० टक्के कमिशन ठेकेदारांकडून मागत असल्याचा आरोप यावेळी केला. या खासदाराकडून विकासात्मक काम शून्य झाले आहे, अशी टीका देखील राऊत यांच्यावर ना. राणे यांनी केली.
तर दुसरीकडे मोदींसारख्या नेतृत्वाला ‘अब की बार भाजप तडीपार’ अशी भाषा उद्धव ठाकरे करीत आहेत. मात्र, तुमची कुवत काय ? तुमचे सध्या ५ खासदार उरले आहेत. या निवडणुकीत तो आकडा शून्यावर येईल, असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.