रत्नागिरी : मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता माझी आहे, पण मी मात्र सत्तेमध्ये नाही असं म्हणत आपण तिसऱ्या अवस्थेतून जात असल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली. आज गुहागरमध्ये झालेल्या आभार मेळाव्यात बोलताना त्यांनी ही नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली.
यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की,
‘यावेळी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला तिसऱ्या अवस्थेत काम करायला लागणार आहे. आज सत्ता माझी आहे, पण मी मात्र सत्तेमध्ये नाहीय, आज मी विरोधी पक्षामध्येही नाहीय. जेव्हा प्रत्यक्ष सत्तेमध्ये मी होतो तेव्हा केलेली कामं, विरोधी पक्षात असताना केलेली कामं, आणि तिसऱ्या अवस्थेमधून मला जावं लागणार आहे. ते म्हणजे सत्ता माझी आहे, पण मी सत्तेत नाहीय. आणि अशा वेळी मला तुम्हा सर्वांना दिलेला शब्द सुद्धा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आज तिसऱ्या अवस्थेतून जात असताना विकासाची कामं करण्याकरिता तुमचा संपूर्ण विश्वास आणि तुम्हा सर्वांचं पाठबळ भास्कर जाधवला अपेक्षित असल्याची भावनिक साद भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना घातली. त्यामुळे भास्कर जाधव यांची नाराजी अजून शमली नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
भगवा फडकवण्याचं आवाहन
या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी गावाच्या ग्रामपंचायती पासून ते दिल्लीच्या खासदारापर्यंत शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी आपण जोमाने काम करण्यास सुरुवात करावी असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीकेची झोड उठवणाऱ्या भाजप वर जोरदार हल्ला केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपने सेनेचे उमेदवार पाडण्यासाठी 44 ठिकाणी बंडखोर उभे करून त्यांना रसद पुरवल्याचा गंभीर आरोपही केला.